महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मसन्मानासाठी काम करेल : रूपाली चाकणकर

मुंबई : आज देशामध्ये महाराष्ट्र हे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय प्रगत असे राज्य आहे. त्यामुळे महिलांसाठी काम करताना हे अतिशय जबाबदारीचे व आव्हानात्मक असे पद असल्याची मला जाणीव आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आत्मसन्मानासाठी काम करताना कर्तव्यपूर्वक आणि प्रभावीपणे काम करेल याचा मला विश्वास आहे, अशा भावना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर रूपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी व्यक्त केली आहे.
राज्य महिला आयोगावर काम करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंञी अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, अन्न पुरवठा मंञी छगन भुजबळ साहेब , महाविकास आघाडीतील सर्व मंत्री आणि इतर सर्व सन्माननीय नेते यांचे मनापासून आभार मानते.
राज्यातील महिलांना महिला आयोगाच्या माध्यमातून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मला आपल्या सर्वांचेच सहकार्य लागेल आणि ते सहकार्य आपण कराल याची खात्री मला आहे.पहिल्याच दिवशी आश्वासनांची स्वप्न दाखवणार नाही कामाच्या माध्यमातून या जबाबदारीला पुर्णपणे न्याय देईल आणि ‘महिला आयोग’ हा महाराष्ट्रातील सर्व वर्गातील सर्व स्त्रियांसाठी ‘आपला आयोग’ वाटावा यासाठी मी पूर्ण निष्ठेने कार्यरत राहील. असे रूपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे.




