हिवाळी अधिवेशन : विविध परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस आक्रमक

मुंबई : राज्यातील विविध भरती परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या सर्व घोटाळ्यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“न्यासा कंपनीला जानेवारी 2021 ला अपात्र ठरवण्यात आले आहे. 4 मार्चला पुन्हा या कंपनीला पात्र ठरवण्यात आले. पुन्हा त्यांना काम देण्याची आवश्यकता काय होती? चार कंपन्यांना डावलून न्यासा कंपनीला संपूर्ण काम देण्यात आले. त्यामाध्यमातून आधी आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आणि मग म्हाडाच्या भरतीमध्ये घोटाळा झाला. जीए सॉफ्टवेअर कंपनीला देखील अपात्र ठरवले होते त्यानंतर त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा केला. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

फडणवीसांनी केलेल्या मागणीवर नाना पटोले म्हणाले, “चर्चा व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण हे घोटाळे कुठून सुरु झाले आणि याचे धागेदोरे कुठपर्यंत जोडले गेले आहेत याची माहिती राज्याच्या जनतेपर्यंत गेलीच पाहिजे. ज्यामुळे तरुणांची जी गैरसोई झाली याचं कोणीही समर्थन करु शकत नाही. शासनामार्फत काय कारवाई केली जात आहे हे जनतेला कळले पाहिजे. या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत.” अधिवेशन सुरु होण्यापूर्वी भाजपने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकार विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे आमदार यात सहभागी झाले. आरोग्य विभाग व म्हाडा भरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. (देवेंद्र नाना पटोले फोटो, पाय-र्या मिळाल्या तर पाठवतो.)



