ज्ञानेश महाराव यांचे लिखाण म्हणजे नव्या पिढीला जागृत करण्याचे काम : शरद पवार

लेखक, पत्रकार, संपादक, नाटककार ज्ञानेश महाराव यांचा जाहीर सत्कार आज बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला.
पुणे : महात्मा फुले,शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत दिलेल्या विचारांचा वारसा तरुण पिढीने पुढे नेला पाहिजे.ज्ञानेश महाराव हे आपल्या लिखाणातून नव्या पिढीला जागृत करण्याचे काम करीत आहेत. असे मत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
सत्यासाठी असत्या विरुद्ध लढणारे, लेखक, पत्रकार, संपादक, नाटककार ज्ञानेश महाराव यांचा जाहीर सत्कार आज बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी उपमहापौर दीपक मानकर, कार्यक्रमाची संकल्पना असणारे डॉ.श्रीमंत कोकाटे, जयदेवराव गायकवाड, आमदार कपिल पाटील, राहुल पोकळे, प्रा. प्रतिमा परदेशी, अमरजीत पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले इतिहास अकादमी, गिरिप्रेमी ग्रुप, राष्ट्रसेवा समूह, रयत प्रकाशन यांनी केले होते.
पवार म्हणाले, एखादी प्रकाशन संस्था 34 वर्षे चालविणे. त्याचा अंक मिळाला नाही तर अंक वाचण्यासाठी लोक कासावीस होतात.असा संपादक असा लेखक अलीकडच्या काळात क्वचितच पाहायला मिळतो. ज्ञानेश महाराव हे त्या पैकी एक आहेत. त्यांच्या लिखाणातून नव्या पिढीला एक प्रकारे जागृत करण्याचे काम सुरू आहे. तथा कथित साधू संत असो की भोंदू बाबा असोत त्यांचा स्पष्ट पने समाचार घेण्याचे काम महाराव यांनी आपल्या लेखनातून केले आहे.
समाजातील ऐक्य टिकले पाहिजे. त्यासाठी जातीभेद गाडून टाकला गेला पाहिजे. या विचारातूनच महाराव यांनी लिखाण केले आहे. मला आठवतेय एका दिवाळीचा अंक त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून काढला होता. नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचे काम त्यांच्या लिखाणातून झाले आहे. असेही पवार म्हणाले.

यावेळी बोलताना ज्ञानेश महाराव म्हणाले, पुण्यात तरुणीवर झालेला हल्ला थांबवण्यासाठी ज्याप्रमाणे तरुण पुढे आले त्याच प्रमाणे लोकशाहीवर वारंवार होणारे हल्ले थांबवण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. हे तरुण देशाचे भवितव्य आहेत, त्यांच्यावर शिवरायांचे संस्कार असल्याने ते हे धाडस करू शकले. असे तरुण तयार होत असतील तर जातीधर्माच्या नावावर भडकवणाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. महाराव यांनी त्यांच्या पत्रकारितेचा प्रवास ते आजपर्यंतच्या प्रवासाचा उहापोह केला.
पुण्यामध्ये शिवसृष्टी साकारण्यासाठी पवार साहेबांनी लक्ष घालावे- दीपक मानकर यांची मागणी
दीपक मानकर म्हणाले, ज्ञानेश महाराव यांनी आपल्या लेखनातून समाज प्रबोधनाचे मोठे काम केले आहे त्यामुळे हा सत्कार्याचा सत्कार आहे. ज्ञानेश महाराव यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचा सत्कार शरद पवार यांच्या हस्तेच होऊ शकतो. त्यामूळे या कार्यक्रमाचे त्या पद्धतीने आयोजन करण्यात आले.
पुण्यामध्ये शिवसृष्टी व्हावी यासाठी मी प्रयत्न करीत आहे. 2009 साली पुणे महापालिकेकडून कोथरूड मधील कचरा डेपोच्या जागी शिवसृष्टीला मान्यता मिळाली मात्र त्या जागेवर मेट्रो प्रकल्प करण्यात आला. 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सोबत मुंबईत बैठक घेऊन शिवसृष्टी साठी 100 एकर जागा देण्याचे आश्वासन दिले. परंतू अद्यापही याला यश आले नाही. तमाम शिवभक्तांची मागणी लक्षात घेऊन पवार साहेबांनी या विषयात लक्ष घालून पुण्यातील शिवसृष्टी साकारण्यासाठी मदत करावी अशी विनंती मानकर यांनी केली.






