रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला ; काय आहे हल्ल्यामागचे कारण

मुंबई : मुक्ताईनगर जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांकडून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.
राष्ट्रवादी शिवसेना वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. शिवसेना आमदार चंद्रकात पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप रोहणी खडसेंनी केला आहे.
महिलांची छेड काढणाऱ्या आणि त्यांची अडवणूक करणाऱ्यांना चोपच नाही, तर त्यांचे हात तोडून टाकू, असा इशारा रोहिणी खडसे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यावरुन हा सर्व वाद टोकाला पोहोचला. याच वादातून रोहिणी खडसेंच्या गाडीवर हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे तर रोहिणी खडसे मुक्ताईनगरमधील अवैध धंद्याविरोधात आवाज उठवत असून त्यातूनही हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले..
चालकाने रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केलं त्यामुळे ते सुखरूप बचावले. पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांनी या हल्ल्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “रोहिणी खडसे आपले स्वीय सहाय्यक आणि चालकासह मुक्ताईनगरकडे येत असताना काही अज्ञातांनी रॉडच्या सहाय्याने त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीच्या पुढील काचेवर रॉडने हल्ला करण्यात आला. या घटनेचा तपास सध्या सुरु आहे”.
“मुक्ताईनगरच्या या पावनभूमीत महिला लोकप्रतिनिधी आहेत. अशा या मतदारसंघात महिला लोकप्रतिनिधीवर हल्ला होत असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. मी तीव्र शब्दात याचा निषेध करतो,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.



