11 गावांचा आराखडा करू न शकलेल्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न : धुमाळ

पुणे- पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 23 गावांच्या विकास आराखड्यासाठी महाविकास आघाडी सरकारने वेगाने सुरु केलेली प्रक्रिया पाहून 11 गावांचा आराखडा करू न शकलेली महापालिकेतील सत्ताधारी भाजप आपले अपयश लपवण्यासाठी उलटसुलट टीका करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.
धुमाळ यांनी म्हंटले आहे की, पीएमारडीए च्या हद्दीतील गावांचा खऱ्या अर्थाने विकास होण्याची सुरुवात महाविकास आघाडी सरकारने केली आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट 23 गावांच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे.
हरकती सूचना याची प्रक्रिया करून विकास आराखडा अंतिम होऊन 23 गावांच्या विकास होईलच, परंतु पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला 11 गावांचा अजूनही विकास आराखडा करता आलेला नाही. त्यामुळेच आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत असल्याची टीका धुमाळ यांनी केली आहे.
पुणे महापालिकेतील सत्ताधारी पक्ष 11 गावांच्या बाबतीत पुर्णपणे हलगर्जीपणा दाखवत असल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे व पीएमारडीए प्रशासनाचे 23 गावांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मी अभिनंदन करते.




