गणेशोत्सवातील खर्च टाळून लक्ष्मीनगरमधील बालाजी मित्र मंडळ व सफाई सैनिकांनी भरली २५ विद्यार्थ्यांची शालेय फी

वस्ती विभागातील मुलांच्या शिक्षणासाठी महत्वाचं पाऊल
कोथरूड : गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करत, मिरवणुकीचा खर्च टाळून बालाजी मित्र मंडळाने जमा झालेली वर्गणीची रक्कम व सफाई कर्मचाऱ्यांनी जमा केलेली रक्कम अशा संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्या मंदीर प्रशालेमध्ये शिक्षण घेणाऱ्या २५ होतकरू मुला मुलींची ६६०००/- रुपये वार्षिक शैक्षणिक फी भरण्यात आली. लक्ष्मीनगर वसाहती मधील बालाजी मित्र मंडळाने व त्या भागात काम करणाऱ्या सफाई सैनिकांनी वस्ती विभागातील मुलांच्या शिक्षणासाठी उचललेले हे पाऊल एक नवा आदर्श निर्माण करणारे आहे. आपल्या वस्तीतील मुले शिकली पाहिजेत, त्यांनी मोठे होऊन उज्वल भविष्य घडवावे असे मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाटणे हे अभिमानास्पद आहे.
बालाजी मित्र मंडाळाचे सहकारी पदाधिकारी व अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर यांनी वर्गणी जमा करून गणपती उत्सव साधेपणाने साजरा केला. गणपतीच्या मिरवणूकीत डिजेला खर्च न करता वर्गणीची रक्कम तसेच सफाई कामगांराच्या कष्टाची रक्कम या सामाजिक उपक्रमाला देऊन पुणे शहरात असा पहिलाच एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवला आहे.
डहाणूकर कॉलनीतील सरस्वती शाळेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात या फिची रक्कम शाळेकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र तटकरे, पोलीस निरिक्षक चव्हाण, कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाचे ब्रँन्ड अम्बँसिडर मोकादम वैजीनाथ गायकवाड मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर, शिक्षक, पालक उपस्थित होते. आरोग्य निरिक्षक करण कुंभार, बालाजी मित्र मंडळाचे महिला अध्यक्षा राजश्री बाळासाहेब दांडेकर, हास्य क्लबचे अशोक पुजारी, जेष्ठ नागरिक कुमार आठवले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय शुल्क भरल्याची पावती सरस्वती शाळेच्या वतीने देण्यात आल्या.
यावेळी उद्योजक सुनिल कुऱ्हाडे, नंदूशेठ वावळ, मारुलकर, बाळासाहेब विचारे, अनिल पटवर्धन, अश्विनी मोडक, सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला ढेरे, सचिव संध्या डंभीर, चांदेकर मॅडम, सह शिक्षक कैलास सरतापे, किरण कोल्हे, अर्चना शेंडगे तसेच बालाजी मित्र मंडळाचे विनोद धावारे, अक्षय ढगे, बाळा कसबे, अक्षय शरणांगत, सनी आंबवडे, ओंकार वाघ, कार्तिक दांडेकर, गणेश चव्हाण तसेच पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

वैजनाथ गायकवाड म्हणाले की,” ज्या होतकरू विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना शालेय शुल्क भरण्यासाठी जी आर्थिक मदत केली आहे त्यांनी खूप अभ्यास करून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, , वैज्ञानिक उन्नती घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहावे, संसदीय लोकशाही व भारतीय संविधान जतन करून तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव शिवाय बालक बाबू गेणूचे बलीदानाची आठवण ठेवून, मानवी मुल्यांची जपणूक करावी. स्वच्छ भारत, सुंदर भारत, हरित भारत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले”. तसेच मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना शेडगे व आभार प्रदर्शन कैलास सरतापे यांनी केले.









सामाजिक कामात आग्रेसर “बालाजी मित्र मंडळ”
कोथरूड उपनगरातील विशेषतः डहाणूकर कॉलनी सारख्या उच्चभ्रू भागात स्मृतीवनाच्या कुशीत लपलेली एक कष्टकरी कामगार वर्गाची वसाहत आहे. त्या कामगार वसाहतीचे नाव आहे लक्ष्मीनगर वसाहत आणि वसाहतीत राहून सन १९९३ साली “बालाजी मित्र मंडळ” नावाने एक गणेश मंडळ बाळासाहेब दांडेकर यांनी स्थापन केले. या मित्र मंडळाच्या व महानगरपालिकेच्या तसेच कमिन्स इंडिया लिमिटेड, जनवाणी सहकारी संस्था, स्वच्छ सहकारी संस्था, सेवा सहयोग फाउंडेशन, हर्षदीप फाउंडेशन, स्वच्छ सहकारी संस्था, सागर मित्र या स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून स्वच्छता, व्यसन मुक्ती, पर्यावरणपुरक सण साजरे करणे, महिलांना शिवणकाम प्रशिक्षण, मनपाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, लोकशाही व संविधान जागृती व शैक्षणिक साहित्य वाटप करणे, स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिन महिला सफाई कामगारांच्या हस्ते करून त्यांचा उच्चीत सन्मान करणे अशाप्रकारचे विविध उपक्रम राबवून कामगार वर्गात जनजागृती पर कार्यक्रम सातत्याने राबवले जातात.















