महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी राणेंना ओरडले; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राणेंच्या पीएला दम दिला होता, असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. विनायक राऊत यांनी म्हटले की, नारायण राणे यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे यांना दम भरला. आधी या सचिवाला काढून टाका अन्यथा तुमचे खाते काढून घेतले जाईल, असा थेट दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला.

केरळच्या खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला आणि..

काही दिवसांपूर्वी केरळच्या खासदाराने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत नारायण राणे यांची भंबेरी उडाली होती. केरळच्या खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला होता. नारायण राणे यांनी त्यावेळी कानाला हेडफोन लावला होता. त्यामध्ये प्रश्नाचे हिंदीत भाषांतर करण्यात आले होते. परंतु, नारायण राणे यांना हा प्रश्नच समजला नाही. राणेंना आधीच मालवणी आणि मराठीही धड बोलता येत नाही. फडणवीस हे नावही त्यांना धड उच्चारता येत नाही. हिंदी भाषेचा तर पत्ताच नाही. त्यामुळे तेव्हा नारायण राणेंना केरळच्या खासदाराचा प्रश्न समजलाच नाही. ते तामिळनाडू राज्यासंदर्भात बोलत राहिले आणि प्रश्नाला काहीतरी वेगळेच उत्तर दिले आणि त्यांची फजिती झाली. त्या घटनेनंतर नारायण राणे आजपर्यंत हे लोकसभेची पायरी चढलेले नाहीत, असे विनायक राऊत यांनी म्हटले.

लोकसभेच्या कारकिर्दीत प्रश्नोत्तराच्या वेळी आपण एकदा तरी उभे राहिलात का, असा प्रश्नदेखील राऊतांनी नारायण राणे यांना विचारला. जिल्हावासियांना एकदा तरी सांगा एमएसएमई या शॉर्ट फॉर्म चा फुल फॉर्म, कळलंच नाही तर काय सांगणार, अशी बोचरी टीकाही विनायक राऊत यांनी केली.

उदय सामंत यांची पदवी बोगस

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा देखील विनायक राऊतांनी समाचार घेतला. उदय सामंत यांची डिग्री बोगस असल्याचे पुरावे भाजपानेच मीडियाला दिले असे ते म्हणाले. आधी अब्दुल सत्तार यांना आडवे केले. संजय राठोड यांना भाजपाने सोडले नाही. आता उदय सामंत यांची पाळी आहे, असे विनायक राऊत यांनी म्हटले. उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या एकाही कार्यकर्त्याला किंवा सरपंच झाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा बांधकाम क्षेत्रातला घोटाळा आणि डांबरातला काळाबाजार आम्ही कधीही उघड करू शकतो, असा इशारा देखील राऊत यांनी यावेळी दिला. शिंदे सरकारचं औटघटकेचं राजकारण दोन ते तीन महिने सुरु राहील. त्यानंतर भाजपच शिंदे गटाचं विसर्जन करेल, असे भाकीत विनायक राऊत यांनी वर्तविले.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये