कोथरूड मधील आशिष गार्डन- सागर कॉलनी- शांतीबन चौक डीपी रोडचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

कोथरुड : महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून पुणे मेट्रो, चांदनी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार असे अनेक विकासाचे प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात ५० विरुद्ध पाच वर्षांच्या कामांचा हिशेब जनतेसमोर मांडणार असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित कोथरूड मधील आशिष गार्डन- सागर कॉलनी- शांतीबन चौक डीपी रोड पूर्ण व्हावा यासाठी स्थानिक नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, श्रद्धा प्रभुणे यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत होता तर चंद्रकांत पाटील यांनीही पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लागवा म्हणून प्रयत्न केले होते. आज अखेर या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. सिंहासन news ने ही रस्ता खुला व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक किरण दगडे-पाटील, दिलीप वेडे-पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, वासंती जाधव, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, दिनेश माथवड, स्विकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, गणेश वरपे, कैलास मोहोळ, सागर कडू आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, १९८२ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना, अनेकदा पुण्यात येण्याचा योग आला. तेव्हापासून पुणे शहराची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे आशियातील सर्वात जलदगतीने वाढणारं शहर म्हणून पुण्याची ख्याती झाली. वाढत्या लोकसंख्येनुसार रस्ते, पाणीपुरवठा वाहिन्या, ड्रेनेज लाईन आदी नागरी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून निर्माण करण्याची गरज असते. गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून हे विषय मार्गी लावण्यासोबतच पुण्याच्या विकासाच्या अनुषंगाने मेट्रो, चांदनी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार प्रकल्प यांसारखे अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार आहोत.

तापकीर म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील हे कोथरुडचे आमदार झाल्यानंतर अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने कोथरुडकरांना वेळ देऊ शकतील का? पण प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळताना, त्यांनी मतदारसंघावर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ दिला नाही.
यावेळी नगरसेवक किरण दगडे-पाटील दिलीप वेडे-पाटील नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, अल्पना वर्पे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना डीपी रस्त्याचे काम पूर्णत्वास येण्यापर्यंतचा इतिहास मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले. तर सागर कडू यांनी आभार मानले.



