चांदणी चौकात भूकंप; कामासाठी मोठे स्फोट, कामाची घाई नको आणि स्फोटही नको नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

पुणे : चांदणी चौकातील कामासाठी परवा रात्री पुन्हा मोठ्या तीव्रतेचे दोन स्फोट करण्यात आले. वेगाने काम पूर्ण करण्यासाठी हे स्फोट करण्यात आले. मात्र या परीसरात राहणाऱ्या नागरिकांना याची कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आली नसल्याने या स्फोटांच्या आवाजाने नागरिक भयभीत झाले. याविषयी नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
प्रशांत कनोजिया(मनसे) म्हणाले, परवा रात्री दोन स्फोटाने बावधान व कोथरुड परीसर हादरले कुठलीही पुर्व कल्पना नागरीकांना न देता अनेक वेळा चांदणी चौक मधे असे स्फ़ोट झाले आहेत तेथील नागरीकांना रशिया युक्रेन मधे राहत असल्याची जाणीव होत आहे.काल झालेल्या स्फोटा नंतर अनेक ज्येष्ठ नागरीक लहान मुले घाबरुन उठले प्रोजेक्ट पुर्ण करण्याच्या घाई मधे असे नागरीकांच्या जीवाशी खेळणे अत्यंत निंदनीय आहे चांदणी चौक पुल पाडताना जितका आवाज होता त्या पेक्षा मोठा आवाजांचे दोन स्फ़ोट परवा रात्री उशीरा १२:३० ते १:०० च्या दरम्यान घडले बावधान,उजवी-डावी भुसारी कॅालनी ,वेदभवन,महात्मा परिसर भागातील नागरीकांनी निषेध व्यक्त केला आहे.
सतीश शिंदे (नागरिक) म्हणाले, चांदणी चौक भव्य पूला चे उदघाटन 1 मे रोजी होणार आहे. त्या साठी अती वेगाने काम चालू आहे, हा प्रोजेक्ट राज्यातील महत्वाचा प्रकल्प आहे, इतकी घाई कशासाठी चालू आहे? ‘दुर्घटना से देर भली’. 1 मे ला अवघे 23 दिवस बाकी आहेत, काम पुर्ण होणार नाही ही दगडावरची रेघ आहे. साडे तीन महिन्यानंतर 15 ऑगस्ट ‘स्वातंत्र्य दिन’ येणार आहे, राष्ट्रीय ध्वज वन्दन करुन या पुलाचे उदघाटन केल्यास त्यास एक वेगळे महत्व, वैभव प्राप्त होइल,व या सोहळ्यास ही राष्ट्रीय महत्व मिळेल. या पुलावर लढाऊ विमाने, रणगाडे, जहाज सुशोभित होणार आहेत, या साठी उदघाटनासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख योग्य आहे. साडे तीन महिने अधिक मिळाल्याने सर्व राहिलेली कामे अपेक्षीत, उत्तम दर्जाची व प्रदिर्घ टिकाऊ होतील, व पुढिल मेन्टनन्स चा खर्च कमी होइल.

प्रसाद शिरगांवकर ( नागरिक) म्हणाले, ऐका ना हो NHAI, तुम्हाला तुमचं काम करण्यासाठी स्फोट करावे लागतात हे मान्यच आहे. पण असे स्फोट करण्यापूर्वी आजूबाजूच्या रहिवाश्यांनी कळवण्यात नक्की काय अडचण असते? तुम्हाला तुमचं काम पूर्ण करायचं आहे हे मान्यच आहे. हे आमच्यासाठीच करत आहात हेही मान्य आहे. पण आमच्या घरात लहान मुलं असतात, त्यांच्या परीक्षा असतात. आजारी किंवा म्हातारी माणसं असतात त्यांना विश्रांतीची गरज असते. हे सगळं तुमच्या गरजेपेक्षा मोठं असतं असं नाही म्हणायचं मला. पण निदान जे काही स्फोट बिट करता त्याबद्दल आधी कळवलं तर आम्ही मनाची तयारी तरी करू शकू.
नंदिनी देव, ला व्हॅले कासा, बावधन.(नागरिक) म्हणाल्या, आता चांदणी चौक चौपदरी होणार… वाहनांची कोंडी सुटणार,. आरामशीर प्रवास होणार अशी उ्दघोषणा झाली तशी सुरक्षित शिस्ताबद्ध राहदारीची गोड स्वप्ने पाहत आम्ही बावधनकर गाई गाई करू लागलो… पण हाय रे कर्मा! चांदणी चौकाचा पूल पाडला, रस्त्याचे खोदकाम सुरु झाले आणि बरोबरीला सुरु झाले ते अशक्यप्राय असे धमाकेदार ब्लास्ट्स! दर दिवशी म्हणजे अपरात्री साधारण 1च्या सुमारास रोज ब्लास्ट्सचे दुष्टचक्र सुरु झाले… बावधनच्या वेशीवर असलेली आमची सोसायटी या प्रकाराने भयग्रस्त झाली… अनेक विनंत्या अर्ज, मीटिंग्ज होऊनही उपयोग शून्य! तरी उद्याची स्वप्ने पहात मन मारून मंडळी रस्त्याचे काम पूर्ण होण्याकडे डोळे लावून बसली… रोजचे ब्लास्ट्स, रस्त्यावरील रात्री अपरात्रीची कामे व त्यामुळे दिवसागणिक इमारतीला पोचणारी क्षती, अकारण सर्वांनाच होणारी त्रासदायक जागरणे, कोथरूड हून परताताना 3/4 km चा आगाऊ प्रवास..एक ना अनेक…एकीकडे इमारतीतील सदस्य आपापल्या परीने वरिष्ठाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते . रस्त्याच्या कामाचे महत्व समजून कमी ताकदीचे ब्लास्ट्स घडवल्यास समजण्या सारखे होते… पण..अशातच काल रात्री तर काळजाचा थरकाप उडवणारा भयंकर ब्लास्ट झाला आणि आमची la valle कासा बिल्डिंग अक्षरशः मुळापासून थरथरल्याचा भूकंप सदृश भास झाला… दूरपर्यंत दरडीच्या शिळा उडत गेल्याचे स्पष्ट आवाज आले लागोपाठ तेवढ्याच ताकदीचा दुसरा ब्लास्ट करण्यात आला.. सर्व रहिवासी बिल्डिंग मधील मंडळींना क्षणभर उतरून पळावे की काय असा विचार मनात येऊन गेला.त्यात सोसायटीची पॉवर cut झाली…आता मात्र पाणी डोक्यावरून वाहते आहे.. यापुढे असे ब्लास्ट्स आम्ही सहन करणे शक्य नाही ही सोसायटी ची निर्वाणीची भूमिका आहे.



