वारजेत परिसर स्वच्छता विकास समितीची स्थापना..

नागरिकांच्या पुढाकारातून समितीची स्थापना
वारजे : पुण्यातील वारजे नाका भागातील चैतन्यनगरी समोरील विठ्ठल मंदिरात पहिली नागरिकांची परिसर स्वच्छ्ता विकास समिती स्थापना करण्यात आली आहे. बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
देशमुख म्हणाले की, नागरिकांच्या सहकार्याशिवाय महानगराचा विकास होणे केवळ अशक्य आहे, त्यासाठी ही विठ्ठल मंदिर परिसर स्वच्छता विकास समितीची स्थापना पुण्यात नव्या विकासाच्या दिशा देऊन आदर्श घडवेल. २१ वर्षापूर्वी अकोल्यात आयुक्त असताना अशाच पद्धतीने इंद्रायणी परिसर विकास समितीची झाली होती. जठार पेठ येथे त्यांनी चांगले प्रयोग करून दाखवले. त्याचा अनुभव व तेथे कार्य करणारे सुनील भागवत आज वारजेतील चैतन्य नगरीत राहत असून समिती स्थापनेत कार्यरत झाले आहेत ही चांगली व जमेची बाब आहे.
मागील महिन्यात स्टर्लिंग सोसायटी, चैतन्य नगरी, ईशान नगरी व अन्य सोसायटी समोरील दुर्गा व शनी मंदिराचा रस्ता पूर्ण स्वच्छता करून कचरा विरहित करण्यात आला आहे. येथील सर्व सोसायटी अपार्टमेंटला एकत्र करून स्वच्छतेचे कार्य करून समस्या सोडवण्यासाठी ही समिती प्रयत्नशील राहणार आहे. या कार्यासाठी प्रभागातील नगरसेविका दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी मोलाच्या सहकार्यसह स्वच्छतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे नियोजन ही त्यांनी करून या परिसराच्या विकासाचे व्रत पूर्ण केल्याचे यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी परिसरातील अस्वच्छ जागा स्वच्छ करून ईशाननगरी कडे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी दिपाली धुमाळ यांच्या महापालिकेच्या विकास निधीतून करण्यात येणाऱ्या विशेष पथ मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वि.दा पिंगळे, शिरपूर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन चैतन्यनगरी फेज २ चे अध्यक्ष प्रदीप खरे यांनी केले.







