संजय गांधी व श्रावण बाळ योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची मुदत वाढवा : राघवेंद्र मानकर यांची मागणी

पुणे : संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना ३० जून २०२२ पर्यंत उत्पन्नाचे दाखले जमा करण्यास सांगण्यात आले आहे. या योजनेचे लाभार्थी हे वृद्ध अपंग व विधवा या गटातील असून त्यांच्याकडून म्हणावी अशी धावपळ होणे शक्य नाही त्यामुळे उत्पन्न दाखला जमा करण्याची तारीख ३० जून २०२२ ऐवजी पुढे वाढवून मिळवी अशी मागणी भाजप पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी केली आहे.
या संदर्भात पुणे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांना राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले . यावेळी पुणे शहर सरचिटणीस दिपक पवार, राजू परदेशी, सुनील मिश्रा, कसबा मंडल अध्यक्ष अमित कंक आदी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळाला दिले आहे.
राघवेंद्र मानकर यांनी सांगितले की, ‘संजय गांधी व श्रावण बाळ’ योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या चालू उत्पन्न दाखले मागितले जात आहेत. गेली दोन वर्षे “कोविड-१९” च्या महामारी कालावधी मध्ये गेली, त्यामुळे ‘संजय गांधी व श्रावण बाळ योजना’ कार्यालयाकडून उत्पन्नाचे दाखले मागितले गेले नव्हते. परंतु आता ह्या कार्यालयांनी कमी कालावधीत उत्पन्नाचे दाखले जमा करण्यास सांगितले आहे. वेळ कमी असल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे हाल होत आहेत.
सध्या शाळेचे व कॉलेजचे अॅडमिशनचे काम चालू झालेले आहे, त्यामुळे सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यामुळे उत्पन्नाचे दाखले एवढ्या कमी कालावधीत मिळणे शक्य नाही. त्यामुळे या योजनेपासून गरजू वंचित राहू नयेत यासाठी उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे.




