पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी

पुणे : धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पुण्यात आता ३० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले आहे. पाऊस लांबणीवर पडला तर स्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी या काळात २६ टीएमसी पाणीसाठा चारही धरणांमध्ये शिल्लक होता. सध्या चारही धरणांमध्ये मिळून केवळ १४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या सर्वभागांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून, पुणे महापालिका त्याचे नियोजन करणार आहे.
पुढील काळात मोठा पाऊस पडण्याची शक्यता नसल्यामुळे पाणीकपात न केल्यास उन्हाळ्यामध्ये भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, असे जिल्हाधिकाऱयांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेकडूनही पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्यात येत आहे. पाण्याच्या वापराबाबतीत नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. शहराच्या अनेक भागात नागरिक पाण्याचा अपव्यय करत असल्याचे आजही दिसून येत आहे.






