महाराष्ट्र

महाविकास आघाडीचा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल; जयंत पाटलांचं वक्तव्य

सांगली : “राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीत अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपाचे सरकार करत आहे. त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.

जयंत पाटील म्हणाले, “महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमागे १०० टक्के एक अजेंडा आहे. एखादा बुरुज जर पाडायचा असेल, तर त्या बुरुजाच्या एका – एका दगडावर हल्ला केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. आपल्या स्वाभिमानावर हल्ला करून हा बुरुज पाडण्याचा प्रकार सुरू आहे. ही वक्तव्य चुकून केली जात नाही, अज्ञानाने झालेले नाही, जाणीवपूर्वक केली जात आहेत.”

कारस्थान सुरू आहे

“जुना इतिहास पुसून काढायचा, महाराष्ट्राचा वेगळा इतिहास रचायचा हे कारस्थान आहे. नवा इतिहास आपल्यापासून सुरू झाला पाहिजे असे काही लोकांना वाटते. त्यासाठीच खरा इतिहास पुसून नवा इतिहास मांडण्याचे कारस्थान सुरू केले आहे,” असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.

लोकं भाजपच्या लोकांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करतील

जयंत पाटील पुढे म्हणाले, “महापुरुषांची अस्मिता कशी भंग होईल, कमी कशी होईल यासाठी प्रयत्न होत आहेत. भाजपचे लोक त्यात अग्रणी आहेत. लोकांच्या मनात तीव्र राग आहे. लोकं भाजपच्या लोकांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करतील.”

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही महाराष्ट्रद्रोही लोक

“राज्यपालांना भाजपने तात्काळ हटवायला पाहिजे होते. राज्यपाल महाराष्ट्राच्या विरोधात वागतात, त्यांच्या एकाही कृतीवर केंद्र सरकारने भूमिका घेतली नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत,” असाही आरोप जयंत पाटील यांनी केले.

स्वाभाविक गहाण ठेवला

जयंत पाटील म्हणाले, “गुजरातमध्ये निवडणुका होत्या म्हणून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रकल्प गुजरातला गेले. महाराष्ट्रातील तरुणांची संधी हिसकावून घेतली गेली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाही. उलट तिकडे आलेल्या नवीन सरकाराच्या शपथविधीला उपस्थित राहतात. हे दुर्दैवी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल काहीही बोलतात त्याबाबतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलत नाही. त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे.”

सरकार फक्त आमदार सांभाळण्यात व्यग्र

“महाविकास आघाडी सरकार असताना म्हैसाळ योजनेमार्फत जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी देण्याची संपूर्ण व्यवस्था आम्ही केली होती. या भागांना ६ टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. त्याची डिझाइनिंग पूर्णतः तयार आहे. हा विषय फक्त मंत्रिमंडळासमोर येऊन त्याला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज आहे. मात्र, हे सरकार फक्त आमदार सांभाळण्यात व्यग्र आहे. आज सीमा भागातील अनेक गावे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे इतर राज्यात जाण्याची मागणी करत आहे. हे दुदैवी आहे,” असं म्हणत जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

Fb img 16474137314577667123777135621121

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये