लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19 तर काँग्रेस 8 जागा लढवणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. एकूण 48 जागांपैकी ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी चार जागा ठाकरे गट लढवेल तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असणार आहे.
आगामी लोकसभा अवघ्या एका वर्षावर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 48 पैकी पाच ते सहा जागा अशा आहे ज्यावर महाविकासआघाडीमध्ये पूर्ण सहमती झालेली नाही. त्यामुळे या जागांमध्ये बदल होऊ शकतो.

भाजपने देखील तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्लॅन केलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने यावेळी आपल्या रणनीतीत मोठा बदल केला आहे.
महाराष्ट्रात 48 जागांवर लोकसभेची निवडणूक होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 ला 48 पैकी 23 जागा भाजपनं जिंकल्या तर 18 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला. 4 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजपनं 45 जागांवर जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.त्यामध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपची विशेष नजर असणार आहे.
भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. मोदींची प्रत्येक योजना ही सामान्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आता इतर पक्ष आपलं गणित कसं लावतात आणि हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर सध्या प्रत्येक निवडणूक ही शिवसेना – भाजपच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे भाजपच्या रणनीतीनंतर शिवसेना काय करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.






