अखेर शरद पवारांचे खासदार आणि PM मोदींची बैठक संपली; 15 मिनिटांत नेमकी काय चर्चा झाली?

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात दोन भेटी झाल्या होत्या.दुसरीकडे आज सोमवारी शरद पवारांचे 8 खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. राष्ट्रवादीचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 15 मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती समोर आली आहे.
शरद पवारांच्या 8 खासदारांनी संसद भवानातील पंतप्रधान कार्यालयात पीएम नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेटीनंतर झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सर्व खासदार भेटीसाठी पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यानंतर शरद पवार यांच्या एनर्जीचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे, अशा शब्दात मोदींनी कौतुक केलं.त्यानंतर सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मतदारसंघातील प्रश्न मांडले.

खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या पाण्याचा प्रश्न मांडला. उजनी धरणातून बीड जिल्ह्याला पाणी सोडा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. पीएम केअरमधून खासदारांना 35 प्रकरणांसाठी पैसे मिळतात, त्यांची संख्या वाढवावी. केवळ एका खासदारांसाठी नव्हे, तर सर्व खासदारांसाठी ही वाढ करावी, असा मुद्दा सोनवणे यांनी मांडला.



नवी मुंबईच्या विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी दिल्लीत आंदोलन देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली. नावाविषयी राज्य सरकारने प्रस्ताव मान्य केला आहे. आता प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार म्हात्रे यांनी केली. नगरचे खासदार निलेश लंके यांनी कर्करोगाविषयीचा मुद्दा हा पंतप्रधान मोदींकडे मांडला. खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मुद्दा मांडला. खासदार अमर काळे यांनीही पंतप्रधान मोदींकडे त्यांच्या मतदारसंघाचा मुद्दा मांडला आहे.



