राज्यात कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली ४०० कोटींचा भ्रष्टाचार : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र
मुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची राज्याकडून अंमलबजावणी होत असताना, सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असून या होत असलेल्या गैव्यवहारची माहिती पत्रात दिली आहे. फडणवीस यांनी पत्रात म्हंटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य मिशन ही केंद्र सरकारची योजना केंद्राच्या निधीतून पण राज्य सरकार मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया ही राज्य सरकार मार्फत होते.



या योजनेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भातील काही विधाने मंत्र्यांकडून आल्यानंतर उमेदवारांच्या कायमस्वरूपी नियुक्तीसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवानीला प्रचंड वेग आला आहे. यासंदर्भात दूरध्वनी संवादाच्या तीन ऑडिओ क्लिप माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या या पत्रासोबत जोडल्या असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
या ऑडिओ क्लिप मधील संवादानुसार सुमारे २० हजार असे उमेदवार राज्यात असून त्यांना सेवेत कायम करण्यासाठी त्यांच्याकडून १ ते २.५० लाख रुपये गोळा केले जात आहेत. म्हणजे यासाठी सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपयांचे कलेक्शन होत आहे. सेवेत कायम करण्यासाठी सुमारे चारशे कोटींची उलाढाल महाराष्ट्रात होत असेल तर ते अतिशय गंभीर असल्याचे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
प्रत्यक्षात उमेदवाराकडून १ रुपयांचे संमतीपत्र आणि ५०० रुपये लढा निधी असे संकलन करीत अर्जावर स्वाक्षरी घेतली जाते. आणि सोबत १ ते २ लाख रुपयांदरम्यान रोख रक्कम असलेला लिफाफा वेगळा देण्यास सांगितला जात आहे. ही रोख रक्कम देताना नोटा या ५०० व २ हजार रुपयांच्या असाव्यात असे सांगितले जात आहे. या संवादात अनेक लोकांची नावेही असून ती फडणवीस यांनी पत्रात नमूद केली नाहीत. सोबतच्या ऑडिओ क्लिप मध्ये ती आपल्याला एकता येतील असे त्यांनी सांगितले आहे.
हा पैसा देण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतले आणि त्यांनी तो पैसा जमा केला, पण आता त्यांना केवळ व्याज भरावे लागत आहे. काही लोक एकमेकांना बँकेतून पैसे काढून रोख हातात ठेवा केव्हाही भरावे लागतील असे सांगत आहेत. काही खास बँक खाते सुद्धा यासाठी उघडले गेले आहेत. हा संपूर्ण प्रकार अतिशय गंभीर असून केवळ एका अभियानात सेवेतील कायम नियुक्तीसाठी अशा पद्धतीने ४०० कोटींचा भ्रष्टाचार होत असेल तर कोरोनाच्या कालखंडात आणि तेही आरोग्य क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असेल याची कल्पनाही न केलेली बरी असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
या ऑडिओ फित्तींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सरकारमधील कुणाच्या आशीर्वादाने हा प्रकार होतोय याची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी फडणवीस यांनी या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.



