पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना विनाअट सरसकट धान्य उपलब्ध करून द्या ; अल्पना वरपे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पुणे : अन्न सुरक्षा योजने अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या आदेशा प्रमाणे दि १० मे २०२१ पासून रेशनकार्ड धारक प्रत्येक व्यक्ती प्रमाणे ६ किलो गहू, ४ किलो तांदूळ देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये ज्या नागरिकांचे आधार कार्ड रेशनिंग कार्डशी लिंक आहे, अशाच लाभार्थ्यांना सदर योजने अंतर्गत धान्य मिळत आहे. मात्र आधार रेशनिंग कार्डशी लिंक नसलेल्या गरजू नागरिकांना धान्य मिळत नसल्याने लॉक डाऊन च्या या काळात त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या बाबीचा विचार करून पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना विनाअट सरसकट धान्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच याबाबतचा मेल ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवण्यात आला आहे. Provide Unconditionally grain to yellow and orange ration card holders; Alpana Warpe’s demand to the District Collector

वरपे यांनी म्हंटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांवर आर्थिक संकट कोसळेल असताना केंद्र सरकार व राज्य सरकारचा हा निर्णय स्वागतार्हच आहे, व वस्ती विभागातील अनेक गरीब कुटुंबाना याचा निश्चितच लाभ होताना दिसत आहे, परंतु याच वेळेस अनेकांचे आधार कार्ड रेशनकार्ड सोबत लिंक नसल्याने त्यांना रेशनिंग दुकानातून रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.



रेशनिंग दुकांदाराशी याबाबत चर्चा केली असता त्यांच्या रेकॉर्ड नुसार नोंद असणाऱ्या ग्राहकांच्या संख्ये नुसारच त्यांना धान्य उपलब्ध होत आहे, त्यामुळे रेशनिंग दुकानदार उपलब्ध साठ्या नुसारच कार्ड धारकांना धान्य वितरण करू शकतात. अशा तऱ्हेने आधारकार्ड हे रेशनिंग कार्डला लिंक नसल्याने या तांत्रिक अडचणीमुळे अनेक गरजू कुटुंबाना धान्य मिळत नाही. त्यामुळे ते हतबल झाले आहेत.
सदर योजना ही लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या गरजू कुटुंबांकरिता आणली गेली असून प्रत्यक्षात अनेक कुटुंबाना याचा लाभ मिळताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने अनेक नागरिक या बाबत आमच्या कडे तक्रारी करत आहेत .तरी सदर बाबींचा गांभीर्याने विचार करून पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना विनाअट सरसकट धान्य उपलब्ध करून द्यावे. यामध्ये अशा रेशनकार्ड धारकांची त्या त्या भागातील रेशनिंग दुकानदारांकडे नोंदणी करून घ्यावी व सदर दुकान धारकांना त्या प्रमाणात धान्य उपलब्ध करून देण्यात यावे तसेच सदर योजनेची मुदत देखील वाढवावी. अशा प्रकारे सदर प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून या बाबत योग्य निर्णय घ्यावा व संबंधित विभागाला त्वरित सुधारित आदेश व सूचना कराव्यात अशी मागणी वरपे यांनी केली आहे.



