पुणे शहर

शाळेत सांताक्लॉज आणला जातो तसा हजारो वर्षे परंपरा असलेला वासुदेव का आणला जात नाही : डॉ. भावार्थ देखणे

पुणे : महाराष्ट्राच्या लोककलेचं शरीर जरी मनोरंजनाच असलं तरी त्याचा आत्मा मात्र प्रबोधनाचा आहे. सकाळी वासुदेव येवून गेल्यावर अनेक लोकभुमिका येऊन जायच्या त्या मनोरंजनातून लोकांचे आध्यात्मिक प्रबोधन व उद्बोधन करायच्या. काळाच्या ओघात ही पात्र मागे पडत चालली आहेत. आज शाळेत जसा सांताक्लॉज आणला जातो तसा हजारो वर्षे परंपरा असलेला आपला वासुदेव का आणला जात नाही असा सवाल आज आपल्या व्याख्यानातून डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांनी उपस्थित केला.

पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समिती साहित्यिक कट्टा वारजे च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शब्दब्रह्म व्याख्यानमालेत महाराष्ट्राची लोककला या विषयावर डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानातून त्यांनी महाराष्ट्राच्या लोककलेने केलेले प्रबोधन या विषयावर भाष्य केले. माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी या व्याख्यानमालेचे संयोजन केले आहे. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. मल्लिकार्जुन नावंदे तसेच ज्येष्ठ साहित्यिका माधवी वैद्य, बाल साहित्यिका. डॉ. संगीता बर्वे वी. दा. पिंगळे, उपस्थित होते.

देखणे म्हणाले, अंगात शब्द ज्ञानाचा विद्येचा घोळ दार अंगरखा घातलेला आहे, सात्विकतेचे प्रतीक म्हणून गळ्यामध्ये माळ आहे, हातामध्ये टाळ पायात चाळ आहे, नादब्रह्माचा पावा तो वाजवतोय, हातामध्ये चिपळ्या घेतल्यात आणि वासुदेव भोग सोडून त्यागाचे दान मागतोय. आपली संस्कृती ही त्याग व दानाची आहे. साता समुद्रापलीकडे संस्कृती ही भोग प्रदान आहे. आपल्याकडे आधी त्याग आहे आणि जमलं तर भोग आहे, समुद्रा पलीकडील संस्कृतीत आधी भोग व जमलं तर त्याग आहे. वासुदेव त्याला मिळत नाही म्हणून किंवा तो भिकारी आहे म्हणून दान मागत नाही तर आपल्या हाताला दानाची सवय लागावी म्हणून तो दान मागतोय हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

सकाळी वासुदेव दारात यायचा तो गेल्यावर बाळ संतोष, सरोदा, भांड, जोशी, पोतराज, कडकलक्ष्मी अशी लोकभूमिका येऊन जायच्या आणि लोकांचे प्रबोधन करायच्या. कळणारी भाषा आणि पेलणारी तत्वे संत एकनाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून लोकांना सांगितले. बहुरूढ म्हणजे जगावरती किंवा लोकांच्या मनावरती आरूढ असलेला काव्यप्रकार म्हणून भारुडाकडे बघितलं जातं. भारुडाला वेगळ महत्व आणि उंची संत एकनाथ महाराजांनी मिळवून दिली आणि हे भारुड आमच्या परिवाराने जगभर नेलं.

Img 20221126 wa0212847205965836399706

सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, नंदेच कार्ट किरकिर करतय खरूज येऊ दे त्याला या भारुडातून गंमत वाटते,लोकांना हसायला येतं पण त्यातून फार मोठे प्रबोधन केलं गेलं आशा, ममता, माया, व तृष्णा या नंदा आहेत. कामाधी नावाचा नंदवा आहे. ममता आणि कामाधी पासून झालेलं कार्ट म्हणजे त्याचं नाव द्वेष आहे, आणि ते सारखं किरकिर करत असतं. अविवेकाचा नवरा आहे, विकल्पाची सासू आहे, अहंकाराचा सासरा आहे. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपव त्याला म्हणजे अहंकार जो दूर गेला आहे तो तिकडेच राहू दे असं प्रबोधन करण्यात आलेल आहे.

समाजवादी विचारांचे आद्य प्रवर्तक कोण असतील तर ते संत एकनाथ महाराज आहेत असं मला वाटतं. सगळ्यांचा मायबाप एक आहे हे संतांनी आपल्याला सांगितलं ज्या संतांनी जातीभेदाच्या भिंती तोडल्या त्याच संतांच्या नावाने आज आपण जातीभेद करतोय ही फार मोठी शोकांतिका आहे. माझे बाबा रामचंद्र देखणे म्हणायचे महाराष्ट्र हा ओवीने जागा झाला आणि पोवाड्याने जागता राहिला.

संतांनी रूपकांच्या माध्यमातून अध्यात्म विचारांची मांडणी या लोकपरंपरेमध्ये केली आणि खऱ्या अर्थाने अध्यात्म विचारांचे झाड समाजात लावलं गेलं. महाराष्ट्रात समाजवादी जी धार्मिकता आहे ती संतांनी दिली. या सर्व लोकभूमिकांना एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये रूपकात्मक पद्धतीने अध्यात्मक विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रात लोक कला उदयास आली. आपण परमात्म्यापर्यंत जायचे हे तत्त्व दर्शन आहे आणि परमात्म्याला आपल्यापर्यंत आणायचे हे भावदर्शन आहे आणि हे भावदर्शन लोककलेन दिल आहे. हा लोककलावंत आमच्या अध्यात्माचा प्रवर्तक आणि उद्बोधक आहे.

शक्तीला भक्तीचा ओलावा हवा, शक्ती नसेल तर भक्ती टिकू शकत नाही. आज साधुसंतांनी सांगितलेल आपण विसरत चाललो आहोत जे करायचे ते करत नाही पाहिला पाहिजे ते पाहत नाही अनुभवायला पाहिजे ते अनुभव होत नाही त्यामुळे आपली परिस्थिती कठीण होत चालली आहे.

Img 20221128 wa0191670106993962307975

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये