महाराष्ट्र
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या वरळीतील घरातून ताब्यात घेतलं असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत.
पेशाने इंटिरिअर डिझायनर असलेल्या अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.







