जातीवाद संपविण्यासाठी ब्राह्मणांनी पुढं यावं : शरद पोंक्षे

पुणे : समाजातील जातीवाद संपण्याची गरज आहे. यासाठी आता ब्राह्मणांनी पुढे यावं, असं आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं आहे. जात संपणे अशक्य आहे म्हणून त्यासाठी प्रयत्न करायलाच नको असे म्हणून चालणार नाही, याकडेही पोंक्षे यांनी लक्ष वेधले.
‘ब्राह्मणभूषण पुरस्कार’ पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मी ब्राह्मण असलो, तरी मला जातीचा आपल्याला दुराभिमान नाही. जात संपली पाहिजे; मनुष्य हा धर्म टिकला पाहिजे. जात संपविण्यासाठी मी पंधरा वर्षे व्याख्याने देत आहे. जात संपणे अशक्य आहे म्हणून त्यासाठी प्रयत्न करायलाच नको असे म्हणून चालणार नाही.’
जात संपविण्याच्या कामात कधीतरी यश मिळेल. आपले राज्य, देश कधी तरी जातमुक्त होईल, अशीही अपेक्षा व्यक्त करताना सध्या मी बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास सुरू केला आहे, असेही ते म्हणाले. ‘इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार’ दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना देण्यात आला. मानपत्र, पुणेरी पगडी आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यवस्थापकीय संचालक संजय ओर्पे, भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पोंक्षे यांची मुलाखत घेतली. मेधा चिवटे यांनी सूत्रसंचालन केले.




