महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेबांचे संविधान अबाधित ठेवण्यासाठी भाजपला घरी बसवा : राजहंस

लोकशाही व संविधान वाचवणे हाच संविधान दिनाचा खरा संदेश

मुंबई : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलेले आहे. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांपेक्षा अधिक काळ देश लोकशाही व संविधानाच्या माध्यमातून वाटचाल करत आहे परंतु मागील ११ वर्षांपासून देशात लोकशाही व संविधानाला न जुमानता मनमानी व हुकूमशाही कारभार सुरु आहे. लोकशाही व डॉ. बाबासाहेबांचे संविधान अबाधित ठेवायचे असेल तर भाजपला सत्तेतून घरी बसवले पाहिजे, हीच प्रतिज्ञा संविधान दिनी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे.

Img 20250508 wa00015038950216212096978

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे केवळ पुस्तक नाही तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे तसेच देशाची राष्ट्रीय एकत्मता व अखंडता कायम ठेवण्याचे साधन आहे. डॉ. बाबासाहेबांनी संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची हमी दिली आहे. संविधानानेच वंचित, मागास समाजाला सन्मानाने जगण्याचा हक्क व अधिकार देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. परंतु डॉ. बाबासाहेबांचे संविधान आज धोक्यात आले आहे, त्याला पायदळी तुडवत भारतीय जनता पक्षाचे सरकार कारभार करत आहे. सर्व स्वायत्त संस्था केंद्र सरकारच्या हातच्या बाहुले बनवण्यात आल्या आहेत. सरकारी तपास यंत्रणांना भाजप सरकारच्या तालावर काम करावे लागत आहे. निवडणुक आयोग व न्यायपालिकाही स्वतंत्र राहिल्या नाहीत. सर्व सरकारी कंपन्या खाजगी उद्योगपतींना विकल्याने सरकारी नोकऱ्याही गेल्या व आरक्षणही गेले. भाजपचे नेते खुलेआमपणे आरक्षण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपवण्याची भाषा करत आहेत. काहीजण तर बाबासाहेबांचे श्रेयही नाकारत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

UPSC सारख्या परिक्षांतून अधिकाऱ्यांची निवड होत असते पण मागील काही दिवसांत ठराविक विचारसरणीच्या मुला-मुलींना थेट सचिव पदावर भरती केले जात आहे. सामान्य कुटुंबातील, दलित, मागास बहुजन समाजातील मुले-मुली यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये अशा पद्धतीने डावलले जात आहे. भाजप हा आरक्षणविरोधी पक्ष आहे, त्यांना आरक्षण संपुष्टातच आणायचे आहे. राज्यातही आरक्षणावरून एका समाजाला दुसऱ्या समाजाविरोधात उभे केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपला लढा स्वातंत्र्यासाठी आहे, माणूस म्हणून जगण्यासाठी आहे’, हा संदेश दिला होता. आता माणूस म्हणून सन्मानाने जगायचे असेल तर संविधान व लोकशाही अबाधित ठेवावी लागेल व त्यासाठी भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली खेचावे लागेल. आजच्या संविधानदिनी आपण प्रतिज्ञा करूया व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान वाचवण्यासाठी कटीबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घेऊ, असे आवाहन राजहंस यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये