
पुणे : “माझं केंद्र सरकारला विनम्रपणे म्हणणं आहे की प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आता आपली पोरं वाचवा. एकदा आपली पोरं परत आल्यावर काय प्रसिद्धी करायची ती करा. ही प्रसिद्धी आणि राजकारण करण्याची वेळ नाही.” असं खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला आवाहन केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिसंवाद यात्रेला खासदार सुप्रिया सुळे पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, “सातत्याने आम्ही सगळे केंद्र सरकारकडे विनंती करीत आहोत. युक्रेनमध्ये अनेकांची मुले अडकली आहेत, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे. शरद पवार यांनी काल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना फोन देखील केला होता. ती आपली मुलं आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पूर्ण ताकदीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. केंद्र सरकारे जातीने लक्ष घातलं पाहिजे. आज दुर्दैवाने आपण भारताचा एक मुलगा गमावून बसलो आहोत. ही घटना अतिशय दु:खद आणि मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, कृपया कृती करा. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. माझं केंद्र सरकारला विनम्रपणे म्हणणं आहे की प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आता आपली पोरं वाचवा. एकदा आपली पोरं परत आल्यावर काय प्रसिद्धी करायची ती करा. ही प्रसिद्धी आणि राजकारण करण्याची वेळ नाही.”






