नविन वर्षात पुण्यासह महाराष्ट्र थंडीने गारठला; पुण्याचे तापमान 10.9 अंशावर, उत्तर भारतातही थंडीची लाट

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील तापमानामध्ये मोठी घट पाहायला मिळाली असून पुण्याच्या तापमानाचा पारा 10.9 अंशा पर्यंत खाली उतरला आहे.नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारतात थंडीची लाट पसरली आहे. पुढचे आणखी काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पुणे मुंबई सह राज्यात थंडी परतली आहे.थंडीच्या तडाख्याने महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे वर्षाचा पहिलाच दिवस गारेगार गेला.

मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून कमालीची थंडी पडली आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या मुंबईत राहुनच माथेरानचा फील येत आहे. सोमवारी मुंबईत 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कुलाब्यामध्ये 18.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी मुंबईचं तापमान हे 15.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर माथेरानमध्येही 15 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये 11 ते 12 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर पश्चिम भारतातील मोठ्या भागात थंडीची लाट पसरली आहे. येत्या तीन दिवसांत उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या वेगळ्या भागांमध्ये पुढील दोन दिवस थंडीची लाट पसरण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य भारतातील मैदानी भागात हिमालयातून येणाऱ्या वायव्य वाऱ्यांमुळे येत्या दोन दिवसांत वायव्य आणि लगतच्या मध्य भारतातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. यामुळे मंगळवारपर्यंत राजस्थानच्या उत्तर भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात थंडीच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला होता.



