महाराष्ट्रातून एकाच महिन्यात २२०० मुली बेपत्ता; गृहविभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्रात शेकडो मुली बेपत्ता होत असल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. १८ ते २५ या वयोगटातील ७० मुली दररोज बेपत्ता होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मार्च महिन्यात तब्बल २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. पुणे,नाशिक, मुंबई, ठाणे या भागातून सर्वाधिक मुली बेपत्ता होत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या आकडेवारीपेक्षा मार्च महिन्यातील आकडेवारी ही ३०७ नेअधिक असल्याचंही आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या की, आम्ही गेल्या १६ महिन्यांपासून मुंबईतील हरवलेल्या व्यक्तींचा विभागाशी संपर्क साधून बेपत्ता महिलांची संख्या मागवून घेत असतो. त्याच्यावर संबंधित विभागाने काय कारवाई केली, याचाही अहवाल मागवून घेत असतो. सातत्याने आम्ही पाठपुरावाही करत आहोत.
यासाठी आम्ही विभागवार आणि अँटी ह्युमन ट्रॅफेकिंगच्या माध्यमातून जनजागृती मोहिमही राबवत आहोत. नागपूर येथे नुकताच राज्य महिला आयोगाचा हा कार्यक्रम पार पडला. सातत्याने हरवलेल्या मुलींच्या संदर्भात प्रत्येक पोलीस स्टेशनमधील बुकींग सेल कडेही पाठपुरावा केला जातो. ही आकडेवारी अत्यंत गंभीर आहे. राज्याच्या गृहविभागाने यात लक्ष घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात मुली, महिलांचं बेपत्ता होण्याची कारणमीमांसा करणं अत्यंत गरजेचं आहे. गृहविभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावं असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
जनजागृती, हेल्पलाईन आवश्यक
मुली महिलांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्येही जनजागृतीपर उपक्रम राबवावेत आणि राज्य शासनानेही त्वरीत हेल्पलाईन क्रमांक सुरु करावेत. जेणेकरुन पालकानी तक्रारी कुठे कराव्यात आणि त्याचा पाठपुरावा कसा करावा, याची माहिती मिळेल.




