विनम्रता, शक्ती व मानवतेचे मिश्रण म्हणजे प्रभू श्रीराम : डॉ. कुमार विश्वास

गंगा आरतीने रामकथेची भाव-भक्तिपूर्ण सांगता; संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीतर्फे ‘अपने अपने राम’ रामकथा कार्यक्रम
पुणे : प्रसिद्ध रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ रामकथेची शनिवारी गंगा आरतीने भाव-भक्तिपूर्ण वातावरणात सांगता झाली. ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘जय श्रीराम’, ‘पवनसुत हनुमान की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा उद्घोषाने परिसर दुमदुमून गेला. मोबाईलचा टॉर्च लावत डॉ. विश्वास यांच्यासोबत ‘चलो लौट चले रघुराई’ हे भजन गाताना परिसरात चैतन्य संचारले होते. हिमांशू पांडे व सहकाऱ्यांनी गंगा आरती केली. Prabhu Shriram is a blend of humility, strength and humanity: Dr. Kumar Vishwas

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय रामकथेच्या अखेरच्या दिवशी रामनगरी तुडुंब भरून गेली. पुणेकर रामभक्तांनी या भक्तिरसाची अनुभूती घेण्यासाठी गर्दी केली होती. टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या रामकथेला संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, ह.भ.प. पंकज महाराज गावडे आदी उपस्थित होते.



रामकथेच्या सांगता सत्रात बोलताना डॉ. कुमार विश्वास म्हणाले, “प्रभू श्रीराम मानवतेचे, माता सीता शांतीचे आणि वीर हनुमान ज्ञानाचे, शक्तीचे प्रतीक आहेत. प्रभूच्या चरणी समर्पित ज्ञानालाच शांततेचा शोध घेता येईल. ज्याच्यामध्ये शक्ती व विनम्रता आहे, तोच रामाच्या वंशाचा किंवा त्याचा शिष्य असू शकतो. राक्षसांचा वध प्रभू श्रीरामांना असाही करता आला असता, पण आयुष्याच्या वाटेवर संकटांचा, संघर्षाचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रेरणा वनवासात गेलेले राम देतात.”



आजच्या युगात चाललेल्या गोष्टींवर भाष्य करत डॉ. विश्वास म्हणाले, “रामायणामध्ये माता सीतेचे अपहरण झाले. कलियुगात भारतमातेच्या प्रतिष्ठेचे अपहरण, चोरी होताना आपण अनेकदा पाहतो. श्रीराम वनवासात जाताना राजमार्गाचा अवलंब करू शकले असते. मात्र, त्यांना राज्याच्या मर्यादा, संधी आणि भवतालच्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. राज्यातील सर्व प्रकारच्या प्रजेला जोडायचे होते. आजच्या काळी होणाऱ्या पदयात्रा आणि प्रभू रामांनी केलेली यात्रा यामध्ये खूप फरक आहे. देशाच्या प्रतिष्ठेवर अनेकदा घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. अशावेळी प्रत्येक देशवासीयाने आपल्या भारतमातेच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी योगदान द्यावे.”



“रामकथा ही मानवतेच्या कल्याणासाठी ‘बूस्टर’ आहे. कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याची शिकवण रामायण देते. जेव्हा जग प्रतिकूलतेशी संघर्ष करत असेल, निराशेच्या वातावरणात जगात असेल, तेव्हा सूर्यवंशी भगवान राम मार्ग दाखवत राहातात. प्रभू श्रीराम अशी देवता आहे, जे दुःखापासून दूर जाण्याची कल्पना देण्याऐवजी कठीण परिस्थितीमध्ये कुशलतापूर्वक मार्ग काढण्याचे प्रेरणा देतात. सांस्कृतिक व अध्यात्मिक प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात,” असेही त्यांनी नमूद केले.



मुरलीधर मोहोळ यांनी तीन दिवस अतिशय रसाळ व मधुर वाणीतून रामकथेचे निरूपण केल्याबद्दल डॉ. कुमार विश्वास यांचे आभार मानले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देत त्यांचा कृतज्ञापूर्वक गौरव केला. पंकज महाराज गावडे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी, तुळशीहार घालून डॉ. विश्वास यांना सन्मानित केले.



आनंद गगनात मावेना
डॉ. कुमार विश्वास यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्यासाठी तीनही दिवस आबालवृद्धांनी गर्दी गेली होती. कथेची सांगता झाल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसत होता. उत्स्फूर्त मिळणारी दाद, प्रसंगाचे वर्णन ऐकताना पाणवणारे डोळे, मिश्किल टिपण्णीवर हास्यमय प्रतिसाद असे आनंदमय वातावरण रामकथा स्थळी पाहायला मिळाले. रामकथा ऐकत, त्यातून रामाची मूर्ती डोळ्यासमोर आणत जे भाव उपस्थितांच्या चेहऱ्यावर प्रकटत होते, ते पाहून रामभक्तांचा ‘आनंद गगनात मावेना’ असेच वाटत होते.






























