शाळा नसलेले गाव म्हणून पाषाण गावची ओळख होणार का ?

शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्थ न्यायालयीन लढा उभा करणार
पुणे : आज प्रत्येक मुलगा, मुलगी शिकली पाहिजे असं शासनाचे धोरण आहे आणि त्यामुळे गाव, वाड्या वस्त्यांवर शाळा सुरू आहेत पण, पुण्यासारख्या शहरातील उपनगर असलेले पाषाण गावची ओळख आता शाळा नसलेले गाव म्हणून होतीय की काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण येथील गावात असणारी महापालिकेची शाळा दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आली आहे तर दुसरी शासन अनुदानीत असणारी शाळा बंद पडलेली आहे. त्यामुळे गावातील सर्वसामान्य घरातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत अडसर येत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारामुळे गावतच शाळा सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थ आग्रही असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर लढण्याची तयारी सुरू केली जात आहे. पूर्वी पाषाण गावातच पुणे महापालिकेची संत तुकाराम विद्यालय ही शाळा क्रमांक ५५ होती तर नेहरू शिक्षण संस्थेचे शासन अनुदानीत संत गोरा कुंभार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय होते. या दोन्ही शाळा गावातच असल्याने सर्वसामान्य, कष्टकरी वर्गातील मुलांना शिक्षण घेणे सोपे जात होते. मात्र महापालिकेची शाळा पाषाण बाणेर लिंक रोड ला स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे शाळा गावातून दूर गेली. संत गोरा कुंभार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बंद पडले. ही शाळा बंद करण्यामागे वेगळाच उद्देश असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. एक खासगी शाळा आहे पण त्याचे शिक्षण सर्वांनाच परवडेल असे नाही.
अशा प्रकारामुळे पाषाण मधील मुलांच्या शिक्षणामध्ये मोठा अडसर निर्माण झाला असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. पाषाण गावातच शाळा सुरू झाली पाहिजे यासाठी आता माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्याकडून पुढाकार घेतला जात असून ग्रामस्थ, आजी माजी शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक यासाठी एकत्र येऊ लागले आहेत.
तानाजी निम्हण म्हणाले की, ज्यावेळी गावात शाळा होत्या त्यावेळी परिसरात शैक्षणिक वातावरण असायचे पण शाळा बाजूला गेल्या, बंद पडल्या त्यामुळे ते आवश्यक असणारे शैक्षणिक वातावरण राहिलेले नाही, शाळा हे गावाचे वैभव असते पण गावात शाळाच राहिली नसल्याने सर्वसामान्य घरातील मुलांची शिकण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी गावातील शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षक यांना घेऊन संबधित विभागाकडे पाठपुरावा करणार असून न्यायालयीन लढा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.










