सर्वसामान्य माणसाने बँका, फायनान्स कंपन्या, क्रेडिट कार्ड यांचे हफ्ते कसे आणि कुठून भरायचे? नागरिकांचा संतप्त सवाल

कोरोनाशी संघर्ष आणि आर्थिक ओढाताण.
पुणे : प्रत्येक सामान्य माणूस हा बँकांची कर्ज काढून आपला संसार करत असतो आणि दर महिन्याला घरात काटकसर करून त्यांचे हफ्ते देखील प्रामाणिकपणे भरत असतो. पण आज परिस्थिती बदलली आहे, जवळजवळ हा संपूर्ण महिना lockdown असल्यामुळे आणि सर्वच व्यवहार बंद आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारने अजून दि. १५ मे २०२१ पर्यंत lockdown वाढविण्याचा निर्णय घेतला आहे आणि lockdown पुढे अजून किती वाढेल हे आत्ता कोणीही सांगू शकत नाही. अशा नाजूक परिस्थितीत उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद असताना सर्वसामान्य माणसाने बँका, फायनान्स कंपन्या, क्रेडिट कार्ड यांचे हफ्ते कसे आणि कुठून भरायचे? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण सल्लागार राकेश धोत्रे यांनी उपस्थित केला आहे.
धोत्रे म्हणाले, महाराष्ट्र सरकार वेळोवेळी कोरोना विषयी गाईड लाईन्स प्रसारित करत आहे परंतु बँक, किंवा फायनान्स कंपन्यांचे हफ्ते या विषयावर आज पर्यंत सरकारने कोणतीही गाईड लाईन प्रसारित केलेली नाही किंवा सरकार मधील कोणीही यावर भाष्य केलेले नाही. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात लवकरात लवकर खुलासा करून निदान पुढचे ३ महिने तरी बँक हफ्ते न भरण्याची मुभा देऊन महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा ही विनंती.

याबाबतीत धोत्रे यांनी राज्य सरकारला पत्र व्यवहाराव्दारे मागणी केली असून बँक आणि फायनान्स बाबतींत तातडीने मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. अशी मागणी केली आहे.सध्यपरिस्थितीत कोरोना महामारीमुळे आपण सगळेच अगदी मेटाकुटीला आलो आहोत. कोणाचाही फोन आल्यावर मनात एकच धास्ती असते की समोरून आता काय निरोप येईल? किंवा कोरोनामुळे आज कोणी जीव गमावला असेल?ही जरी वस्तूस्थिती असली तरी आपल्याला हा लढा देऊन यावर विजय मिळवायचाच आहे आणि आपण तो मिळवू देखील. परंतु एक सत्य अजून देखील आहे ज्याचा सरकारला विसर पडला आहे असे मला वाटते.



