महाराष्ट्र

सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही : छगन भुजबळ

मुंबई  : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रात पंजाबमधून येणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात सणासुदीच्या वेळी अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

भुजबळ म्हणाले, पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गावर आंदोलन सुरू केले आणि त्यामुळे महाराष्ट्राला आणि अन्य राज्यांना पंजाबमधून होणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने तातडीने उपाययोजना करून भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) अतिरिक्त साठ्यातून मदत मागितली आहे त्याप्रमाणे भारतीय अन्न महामंडळाकडून देखील पुरवठा केला जाणार आहे.

भारतीय अन्न महामंडळाने स्वतःकडे १०.९४ लाख मेट्रिक टन गहू आणि ४.८९ लाख मेट्रिक टन तांदूळ याचा अतिरिक्त साठा करून ठेवला आहे. भारतीय अन्न महामंडळाने आंध्र प्रदेशकडून तांदूळ आणि मध्य प्रदेशकडून गहू याची अतिरिक्त उचल सुरू केली आहे त्यामुळे महाराष्ट्राला यातूनच पुरवठा होणार आहे.येणाऱ्या काळात असलेली दिवाळी आणि दसरा या सणांमध्ये कोणत्याही शिधापत्रिका धारकांना अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये