वारजे साहित्यिक कट्ट्यावर रंगली काव्य मैफिल ; मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विशेष आयोजन

वारजे : समाजातील वास्तवतेवर भाष्य करताना मन हेलावून टाकणाऱ्या कविता तर कधी निसर्गाची किमया सांगताना ते विश्व डोळ्यासमोर उभ्या करणाऱ्या कविता आणि या बरोबरच सुख दुःखाचा मेळ घालणाऱ्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते ते साहित्यिक कट्टा वारजे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा भव्य स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेचे
या काव्य स्पर्धेत सहभागी कवींनी आपल्या काव्य प्रतिभेची चुणूक दाखवताना काव्य मैफील चांगलीच रंगली. यावेळी सादर झालेल्या कवितांनी विविध विषयांवर विचार करायला उपस्थितांना भाग पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारजे साहित्यिक कट्ट्याचे संस्थापक माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यावेळी त्यांनी साहित्यिक कट्ट्याच्या ग्रंथालयाला १००० पुस्तके दिली. स्पर्धेच्या समन्वयक सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांनी स्पर्धेची भूमिका मांडली .
एकूण ६५ कविता या स्पर्धेसाठी आल्या होत्या. त्यातील २५ कविता सादरीकरणासाठी निवडण्यात आल्या होत्या. स्पर्धेत प्रथम ५ क्रमांक काढण्यात आले. सहभागी उपस्थित सगळ्यांना सन्मानपत्र देण्यात आले. आणि सर्वच कवींनी उत्तम सादरीकरण केले .
काव्यस्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे .
प्रथम क्रमांक – अनिल छत्रे -१५०० रू. रोख. सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले .
द्वितीय क्रमांक – विद्या सातारकर – १००० रू रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले .
तृतीय क्रमांक – वीणा पुरोहित – ७०० रू रोख , सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
उत्तेजनार्थ
चिन्मयी चिटणीस -५०० रू रोख , सन्मानपत्र आणि मेमेन्टो प्रदान करण्यात आले .
उत्तेजनार्थ
संध्या वाघ -५०० रू रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध कवी धनंजय तडवळकर आणि प्रसिद्ध कवयित्री चंचल काळे यांनी केले. कवी महेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डी. के. जोशी, जयंत मोहिते,उदय कुलकर्णी,महादेव गायकवाड, नंदकुमार बोधाई, सुरेश जाधव, मानसी नलावडे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
स्पर्धेत सादर झालेल्या प्रथम व द्वितीय क्रमांकाची कविता
हिजडे
नपूंसकत्वाचे नाघडे सत्य स्विकारून,
टाळ्यां वाजवत डंगोरा पिटतात.
मरण यातना भोगतां भोगतां,
सदैव हसतमूख कसे ते दिसतात ?
घोषणांशीवाय निधर्मवाद जपतात,
तरी कोणत्याही आरक्षणांत नसतात.
शापीत आयुष्यालाच वरदान मानतात,
मर्दासारखे आयुष्य बिनधास्त जगतात.
आम्ही मर्द घाबरत जगतो,
सदैव दुर्मुखलेलेच असतो.
राग, संताप, चीड हा काय प्रकार आसतो,
तो फक्त, घरी बायकोसमोरच दाखवतो.
अशा, कणा नसलेल्या बांडगूळांचा
जगी पसरले आहे लोण,
टाळ्यांच्या गजरांत एकदाच ठरवा,
समाजातले खरे हिजडे कोण? ——–
अनिल काशिनाथ छत्रे
वारजे, पुणे
द्वितीय क्रमांक
सुखवस्तु दुःख
मी तीन वर्षांची होते तेव्हा प्रचंड दुःख व्हायचे जेव्हा
माझे खेळणे दुसरा हिसकावूनघ्यायचा तेव्हा !
मी तेरा वर्षांची झाले तेव्हा माझ्यासारखी दुःखी मीच असे
जेव्हा सर्व म्हणायचे, माझ्यापेक्षा शेजारची मीना छान दिसते तेव्हा !
मी 23 वर्षांची झाले तेव्हा दुःखाने उसासत असे जेव्हा नवरा शेजारणीच्या भाजीचे कौतुक करी तेव्हा!
आता प्रौढत्वाकडे झुकल्यावर विचार येतो
किती आपण वेड्या होतो?
जवाएवढे दुःख कुरवाळत बसलो
पर्वताएवढे दुःख तर आपण पाहिलेच नाही !
ज्यांनी बालपणी कधी खेळणी बघितली नाहीत
वयात आल्यावरही रूप निरखायला ज्यांना कधी आरसा मिळाला नाही
ज्यांना भाजीविना कोरडी भाकरी आवंढयाबरोबर गिळावी लागली
त्यांची आठवण आली की खंत वाटते….
आपल्याबरोबर आपले दुःखही सुखवस्तूच होते की !
विद्या साताळकर
एरंडवणा,पुणे






