अदाणीमुळे महाराष्ट्रात भारनियमन; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा दावा

मुंबई : अदानी वीज कंपनीने महावितरणचा वीजपुरवठा बंद केल्याने राज्यावर वीज भारनियमनाचे संकट उद्भवल्याचा आरोपही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. राज्यात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यातच कोळसा तुटवडा आहे. त्यामुळे राज्यात १४०० ते १५०० मेगावॅट विजेचे भारनियमन करावे लागणार असून नागरिकांनी ते सहन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपण आयात कोळशासाठी कंपन्यांना विनंती केली आहे. मात्र, त्यांना वेळ लागणार आहे. आम्ही 8 हजार मेगावॅट क्षमतेने प्रकल्प सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, अशी माहिती त्यांनी दिली. वसुली, वितरण हानी आणि वीज चोरी असलेल्या भागात भारनियमन सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वीज भारनियमनावरून आंदोलनाचा इशारा देणार्या विरोधी पक्ष भाजपला नितीन राऊत यांनी यावेळी सुनावले. वीज भारनियमन एकट्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आहे. केंद्र सरकारचे कोळशाचे नियोजन फसले आहे. शिवाय कोळसा मंत्रालयाला रेल्वे मंत्रालयाचे सहकार्य नाही. त्यामुळे भाजपने खुशाल केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे, असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यात फडणवीस सरकार असताना २०१५, २०१७ आणि २०१८ मध्ये वीज भारनियमन सुरू होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महावितरणला १ हजार ५०० मेगावॅट वीज मिळाली तर भारनियमन तातडीने बंद करू. मात्र, तूर्त वीज उपलब्ध नसल्याने नागरिकांनी पुढील चार ते पाच दिवस भारनियमन सहन करावे तसेच आपल्या भागातील वीज चोरी रोखावी, असे आवाहन राऊत यांनी केले.




