ग्रामीण भागातील यात्रा- जत्रा पुन्हा सुरू होणार…

पुणे: राज्याच्या ग्रामीण भागातील समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या यात्रा आणि जत्रा पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, पुणे जिल्ह्यात प्रशासनाने लहान यात्रा आणि जत्रांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. Yatra-Jatra in rural areas will start again

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गावांचे प्रस्ताव येतील तसे छोट्या यात्रांना परवानगी दिली जाणार आहे. स्थानिक महानगरपालिका आणि प्रशासनाने तशी परवानगी द्यावी, अशा सूचना सौरभ राव यांनी दिल्या आहेत.

मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या जत्रा आणि यात्रांसाठी विभागीय कार्यालयाची परवानगी आवश्यक असेल. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच विभागीय कार्यालय यासंदर्भात निर्णय घेईल. मात्र, छोट्या यात्रा व जत्रांना तशा परवानगीची गरज नाही, असे विभागीय कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली होती. त्यामुळे अनेक गावांमधील जत्रा व यात्रा रद्द कराव्या लागल्या होत्या. या उत्सवांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी उलाढाल होते. जत्रांच्या काळात ग्रामीण भागांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. मात्र, कोरोनामुळे वर्षभर हे सर्व ठप्प होते. मात्र, आता पुणे जिल्ह्यापुरता का होईना ग्रामीण जीवनातील हा उत्साह पुन्हा परतणार आहे.