राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली हे भासविण्याचा प्रयत्न : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : कोणाला हनुमान चालीसा वाचायचा असेल तर ते आपल्या घरात वाचू शकतात. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे असं भासवण्यासाठी विरोधक विविध घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत, असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. मुंबई आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अतिशय उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षाच्यावतीने राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली नाही असं दाखवून राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण ते इतकं सोपं नाही. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित आहे.” असंही यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी बोलून दाखवलं. “माझं मुळात म्हणणं हे आहे की जबाबदार लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करायला पाहिजे आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम करत असताना, आपल्यामुळे कुठल्याही प्रकारची अशांतता निर्माण होणार नाही, कुठल्याही प्रकारचा क्षोभ वाढणार नाही, तेढ वाढणार नाही. अशाप्रकारची त्यांची वर्तवणूक असायला पाहिजे परंतु, अशाप्रकारे न ठेवता आज विनाकारण अशाप्रकारे पब्लिसिटी करणे हे एक पुढे केलेलं प्यादं आहे. त्यांची एवढी हिंमत आहे असं नाही, असे काही प्रश्न त्यातून काढून एक सरकारची प्रतिमा, राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा. हा एक जाणीवपूर्वक प्लॅन दिसतो आणि त्याचाच हा एक भाग आहे.” असं म्हणत वळसे पाटील यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.




