“सरकार येत असतात, जात असतात, तेव्हा…” : अजित पवार बरसले

मुंबई : “महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत शिंदे-फडणवीस सरकार चुकीचे पायंडे पाडत आहे. सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला नकोत. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. भविष्यातील नवे सरकारही जुन्या सरकारकडे बोट दाखवत हा पायंडा कायम ठेवतील. त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल, असा इशाराही पवार यांनी सरकारला दिला. दरम्यान, निधी अडवण्याच्या विरोधात काही नेत्यांनी न्यायालयात दाद मागितल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील विकासकामांना स्थगिती
राज्य सरकारने काही दिवसांआधी पुणे जिल्ह्यातील महाविकासआघाडी सरकारच्या काळातील ५० कोटींच्या विकासकामांना स्थगिती दिली आहे. सरकारच्या आदेशानुसार स्थानिक निधी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेली कामे रद्द करण्यात आली आहेत. त्याचा फटका जिल्ह्यातील विकासकामांना बसला आहे. राज्य सरकारने ज्या कामांच्या निविदा प्रक्रिया झालेल्या नाहीत, तसेच निविदा प्रक्रिया झाली मात्र काम सुरू करण्याचे आदेश नाहीत, अशी सर्व कामे स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रामीण विकास विभागाची महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली कामे रद्द करण्याचे आदेशही सरकारने यापूर्वी दिले होते. राज्यात सत्तातरांची चाहूल लागताच महाविकासआघाडी सरकारने आपल्या आमदारांना जास्तीचा निधी देऊन ऐनवेळी कामे मंजूर केल्याचा आरोप करण्यात येत आहे.






