सत्तेचं ‘शुद्धीकरण’ करा… डागाळलेल्यांना दूर सारा असा आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्याची सूत्रांची माहिती

मुंबई: शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीही फुटल्यानंतर भाजपने अजित पवारांना सत्तेत स्थान दिलं आहे. अजित पवारांना सत्तेत घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे. पण फक्त शिंदे गटच नाराज नाही तर भाजपमधले निष्ठावंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघही नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेचं शुद्धीकरण करा, डागाळलेल्यांना दूर करा आणि निष्ठावंताना संधी द्या अशा प्रकारचा आदेश संघाने भाजपच्या वरिष्ठांना दिल्याची माहिती आहे.
काहीच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पंतप्रधानांनी जो 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता तो अजित पवार यांच्या कथित जलसिंचन घोटाळ्याशी संबंधित होता. पण त्यांच्यावरील कोणतेही आरोप अद्याप सिद्ध झाले नाहीत. पंतप्रधानांनी चार दिवसांपूर्वी आरोप करायचे आणि त्याच नेत्याला भाजपने सत्तेत बसवायचं, थेट उपमुख्यमंत्रीपद द्यायचं हे संघाला रुचलं नसल्याची चर्चा आहे. एवढं कमी की काय, आता एकनाथ शिंदे यांची गच्छंती करुन मुख्यमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लावण्याची तयारीही सुरू झाल्याची चर्चा आहे.

सध्याच्या घडीला भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे 105 आमदार असून त्यांना काही अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. असं असताना सध्याचं मंत्रिमंडळ पाहता मूळचे भाजपचे निष्ठावंत हे केवळ चार ते पाचच असल्याचं दिसून येतंय. इतर मंत्री हे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. अशात मुख्यमंत्रीपदाची संधी असतानाही भाजपला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावं लागलं आणि स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भाजपचे सर्वेसर्वा, त्यांच्याकडे भाजपचे एकहाती नेतृत्व. असं असूनही गेल्या तीन चार वर्षात त्यांना वेगळी छाप उमटवता आली नसल्याची भाजपमध्ये दबक्या आवाजात चर्चा असल्याची माहिती आहे. या काळात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवारांशी जवळीक साधली. 2019 साली पहाटेचा शपथविधी अयशस्वी ठरला असला तरीही त्यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांवर, अजित पवारांवर विशेष मर्जी दाखवल्याची चर्चा आहे.



देवेंद्र फडणवीसांनी या काळात बेरजेचं राजकारण करायच्या नादात काही गोष्टी केल्या पण त्यामुळे भाजपला म्हणावा तितका फायदा झाला नसल्याचंही सांगितलं जात आहे. या काळात भाजपचे दुसरे कोणतेही नवे नेतृत्व समोर आलं नाही. तसेच भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्येही येत्या निवडणुकीत पक्षाला तितका फायदा होणार नसल्याच नमूद केल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे शिंदे गटाला भाजपने सोबत तर घेतलं, पण निवडणुकीच्या राजकारणात त्यांच्या गटाचा भाजपला काही विशेष असा फायदा होईल असं दिसत नसल्याचं भाजपचे नेते खासगीत सांगतात. शिंदे गटाच्या नेत्यांमुळे उलट भाजपची बदनामीच झाल्याची चर्चा आहे. तसेच शिंदे गटाचे किती आमदार पुन्हा निवडून येतील यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना भाजपने अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन रान उठवलं होतं. आता तर कालपर्यंत ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच मांडीवर घेऊन सत्ता चालवावी लागतेय असं चित्र आहे.
गेल्या काही वर्षातील भाजपने उचललेली पावले लक्षात घेतली तर सत्तेसाठी काहीही… कुठल्याही थराला जाऊ शकतात असा संदेश मतदारांमध्ये जात असल्याचं मत संघातील काही वरिष्ठ नेत्यांचं असल्याची माहिती आहे. राज्यातील भाजपच्या याच गोष्टींवर संघ नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यांना बाजूला सारा आणि निष्ठावंतांना संधी द्या… राजकारणाचं शुद्धीकरण करा असा संदेश संघाने भाजपला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



