दसरा मेळाव्याआधी सरकारकडून निर्बंध शिथिल, सभागृहातील कार्यक्रमासाठी 200 व्यक्तींची मर्यादा हटवली

पुणे : दसरा मेळाव्याआधी राज्य सरकारनं निर्बंध शिथिल केल्यानं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एक हजारावर शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित राहू शकणार आहेत. सभागृहात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी कमाल 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा आता हटवण्यात आलीय. दसरा मेळाव्यात नियमांची पायमल्ली झाल्यास विरोधकांच्या टीकेबरोबरच कायदेशीर अडचणीही निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारी पातळीवर खल होऊन केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत ही अट शिथिल करण्यात आली. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तसे आदेश निर्गमित केले आहेत.










राज्यात 22 ऑक्टोबरपासून बहुतांश निर्बंधांमध्ये शिथिलता येणार आहे. कोणत्याही बंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमास एकूण क्षमतेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा लागू होती. आता राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत बंद सभागृहातील कार्यक्रमासाठी असलेली 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा काढली आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबताच आदेश निर्गमित केला असून आता सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. सभागृहात येणाऱ्या सर्वांचे लसीकरण झालेले असले पाहिजे आणि या नियमांचा भंग झाल्यास सबंधित आयोजकांना 50 हजार रूपयांचा दंड आकारला जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.

































