
मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या, तसेच मुंबई- नाशिक-नागपूर आणि मुंबई -पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने दिली आहे.
मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग राज्यातील ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर या चार जिल्ह्यातून जाणार आहे. तर कर्नाटकातील गुलबर्गा आणि तेलंगणातील तीन जिल्ह्यांतून ट्रेन धावेल. या दोन्ही बुलेट ट्रेन मार्गिकांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सरू आहे. येत्या सहा महिन्यात ते पूर्ण होईल, असे नॅशनल रेल्वे हायस्पीड कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सतीशचंद्र अग्निहोत्री यांनी सांगितले. मुंबई-नाशिक -नागपूर या 736 किलोमीटर मार्गाचेही एरियल लिडार सर्वेक्षण सुरू आहे. प्रकल्पाचे रेखाचित्र, पर्यावरणावरील आणि सामाजिक परिणाम यांसह अन्य सर्वेक्षण कामेही केली जात आहेत. ही ट्रेन मुंबई ते नागपूर दरम्यान ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा या जिल्ह्यातून धावणार आहे. बुलेट ट्रेनने हाच प्रवास चार तासांत होणार आहे.




