मुंबईत लोकलसेवेसाठी मनसेचा सविनय कायदेभंग

मुंबई : मुंबईतील लोकलसेवा गेले ६ महिने पूर्णपणे ठप्प आहे, कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती ही आम्ही देखील समजू शकतो. पण मुंबईची जीवनदायिनी असलेली सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प ठेवून हजारो, लाखो माणसांच्या उदरनिर्वाहावरच गदा येत असेल आणि सरकार कोरोनाच्या प्रादुर्भावाचं कारण पुढे करून जर ही सेवा बंद ठेवत असेल तर सरकारचं काहीतरी चुकतंय असा आरोप करीत त्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रवासाचा ‘सविनय कायदेभंग’ करत उस्फुर्त आंदोलन केले.
६ महिने हा कालावधी फार मोठा कालावधी आहे आणि ह्या कालावधीत ही सेवा सुरु करण्यासाठी काही उपाययोजना करणं सरकारला अशक्य अजिबात नव्हतं. ह्या विषयवार अनेक तज्ज्ञांनी अनेक मार्ग देखील सुचवले. पण सरकार ह्याकडे दुर्लक्ष का करतंय? आता तरी झोपेचं सोंग बाजूला ठेवून सरकारने काही उपाययोजना, नियमावली आखून मुंबई लोकल रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा द्यायला हवा. असे मनसेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.



