कोरोना संकटकाळात समाजात सेवाभाव जागृत झाला : मोहन भागवत

नागपूर : कोरोना मुळे जगभरातील लोक हैराण झाले. सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाल्याने आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कोरोनामुळं समाजामध्ये पुन्हा एकदा सेवाभाव जागृत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या महामारीत समाज एकरुप झाला असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले .

नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने व मोजक्याच स्वयंसेवक आणि पदाधिकारी यांच्या उपस्थित पार पडला. ऑनलाईनच्या माध्यमातून देशभरातील स्वयंसेवक मेळाव्यात सहभागी झाले.
भागवत म्हणाले, विसरत चाललेल्या भारतीय संस्कृतीचं मूल्य असलेला सेवाभाव आता पुन्हा एकदा जागृत झाला आहे. समाजातील प्रत्येक जण या काळात एकमेकांना मदत करताना दिसत होता. ही एक चांगली बाब असल्याचे भागवत म्हणाले, कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करताना मृत पावलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना भागवत यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
कोरोना च्या काळात निस्वार्थ भावनेनं सेवा करणाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. कोरोनामुळं उद्भवलेल्या परिस्थितीत एकमेकांना मदत करा, आर्थिक, सामाजिक परिणामांतून स्वत:ला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी सहाय्य करा, असं आवाहनही भागवत यांनी आज आपल्या भाषणातून जनतेला केलं आहे. कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रात कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळे कामगारांना प्रशिक्षण देणं आवश्यक असल्याचं मत भागवत यांनी व्यक्त केलं.
भारत के तुकडे होंगे असे म्हणणाऱ्या लोकांपासून समाजानं दूर राहणं गरजेचं आहे. असे लोक संघाबाबत चुकीचं मत पसरवण्याचं काम करत आहेत. पण संघ आपल्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



