शाळा सुरु करण्यापुर्वी घेण्यात येणाऱ्या दक्षतेबाबत पालिकेने स्पष्टता द्यावी : धुमाळ

पुणे : पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका हद्दीतील सरकारी, खाजगी आणि महापालिकेच्या शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबर पासून सुरू होत असताना पालिकेकडून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम असून शाळांमध्ये कोणती खबरदारी घेतली जाणार आहे याबाबत पालिकेने स्पष्टता देणे गरजेचे असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी म्हटलं आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीतील सरकारी, खाजगी आणि महापालिकेच्या शाळांमधील नववी ते बारावीतील सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थ्यांचे वर्ग सोमवारी २३ नोव्हेंबर पासुन सुरू होत आहेत. पुणे शहरात सरकारी, खाजगी आणि महापालिकेच्या ९ वी ते १२ वी पर्यंतच्या ५७२ शाळा आहेत. त्यात दोन लाख वीस हजार विद्यार्थी शिकतात.

नुकतेच कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थी , शिक्षक, पालक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेच्या दुष्टीकोनातुन दि. २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे व गेल्या दोन दिवसात पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे. प्रत्येक शाळेत ऑक्सीमीटर , सॅनिटाईझर , थर्मलगन याची व्यवस्था केली आहे का? तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दुष्टिने तसेच सरकारच्या आदेशानुसार सुरक्षेसंबंधी सर्व सूचनांचे पालन प्रत्येक शाळेने केले आहे का ? तसेच संपुर्ण शाळांच्या इमारती व वर्ग खोल्या रोजच्या रोज सॅनिटाईझेशन केले जाईल का? याची दक्षता व जबाबदारी कोण घेणार हे निश्चित केले आहे का? तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसान होवू नये याचा विचार करुन पालक व विद्यार्थी यांच्या मनातील सर्व शंकाचे निरासन आपल्या मार्फत स्पष्टपणे करण्यात यावे असे धुमाळ यांनी म्हंटले आहे.



पुणे महानगरपालिकेच्या शाळा असल्या तरी खाजगी शाळाच्या आवारामध्ये कोरोनाच्या संदर्भातील जबाबदारी निश्चित करुन पालकांच्या संभ्रम ही दुर करण्याची गरज आहे. सद्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने दिलेल्या नियमानुसार शाळांचा अभ्यासक्रम , परिक्षा, तासिका online पध्दतीने सुरु असुन पालकांमध्ये सध्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत मत मतांतरे असल्याने याबाबत आपली भुमीका स्पष्ट होणे गरजेचे आहे. आपल्या निर्णयानुसार आजही शहरातील सार्वजनिक ठिकाणे व उद्याने या मध्ये ज्येष्ट नागरिक व लहान मुलांच्या प्रतिबंध असताना अनेक पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संभ्रम आहे.एकंदरीतच शालेय आवारामध्ये असलेली विद्यार्थी संख्या आणि त्यांचे व्यवस्थापन असणारी कर्मचारी संख्या यांची सरासरी लक्षात घेता कोरोना वरती प्रतिबंधात्मक उपाययोजना कशी करण्यात येईल याची सर्व साशंक आहेत. तरी पुणे शहरातील सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सविनय विचार करुन पालकांच्या शंका निरसन करत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.






