बोगस नियुक्तीपत्र देत फसवणूक; दोघांना अटक

पुणे : रांजणगाव एमआयडीसीतील एका प्रतिथयश कंपनीच्या नावाने बनावट सही, शिक्के तयार करून त्याआधारे बिहारमधील अनेक तरूणांना कंपनीतील कामाचे नियुक्तीपत्र देणाऱ्या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले. या दोघांनी प्रत्येकी पाच हजार रूपयेप्रमाणे सुमारे चार लाख रूपये गोळा करून तब्बल ऐंशी जणांना बोगस नियुक्तीपत्र दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत हायर अप्लायन्सेस इं प्रा. लि. या कंपनीचे एच. आर. प्रणय सूर्यकांत धुमाळ (रा. मोशी, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी राहुल गौतम गरामी व सुमन तितास मंडल (दोघे रा. जमालपूर, पश्चिम बंगाल) यांना अटक करून त्यांच्याविरूद्ध आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिन मोहम्मद जमशेद, मोहम्मद आर्यन चुन्ना व मोहम्मद फुरकान बद्रुजसमा (तिघे रा. बरहपुरा, जगदीशपूर, ता. इसाकचक, जि. भागलपूर, बिहार) हे तीन तरूण एमआयडीसीतील हायर कंपनीच्या गेटवर आले व आम्हाला कंपनीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने कंपनीत जॉईन व्हायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आमचे आणखी ७७ सहकारी रांजणगाव गणपती मधील भांबर्डे रोडवर थांबले असून, त्यांनादेखील नियुक्ती पत्र मिळाल्याचे सांगितल्याने व कंपनीत प्रवेश करू लागल्याने सुरक्षा रक्षकाने नियुक्तीपत्राची खात्री करण्यासाठी ते धुमाळ व अंकलेश महाले या ‘एचआर’ला दाखविले. तेव्हा त्यांनी ते पत्र आपल्या कंपनीचे नसल्याचे सांगितले व पत्रासह थेट एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. आमच्या कंपनीच्या नावाने बनावट शिक्के वापरून, बोगस सह्या करून बनावट नियुक्ती पत्र दिल्याची तक्रार दिली.एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेत विलास आंबेकर, ब्रह्मानंद पोवार, रघुनाथ हाळनोर या पथकासह फसवणूक झालेल्या तिघा तरूणांना सोबत घेऊन तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

भांबर्डे रस्त्यावरील एका खोलीजवळ पथक पोचले तेव्हा गरामी व मंडल हे कामगारांकडून नियुक्तीपत्राच्या बदल्यात प्रत्येकी पाच हजार रूपये घेत असल्याचे दिसून आले. तेव्हा पोलिसांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले.कामगारांच्या फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या राहुल गरामी व सुमन मंडल हे दोघे बिहारमधील भागलपूर येथील आयटीआय कॉलेजमध्ये गेले. तेथील प्राचार्य व शिक्षकांना, आम्ही पुण्याच्या हायर कंपनीतून आलो असून, कंपनीत कामगारांची भरती चालू असल्याने तुमच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी मुलाखती घेऊ इच्छितो, असे सांगितले. मुलाखती नंतर ऐेंशी विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे सांगत त्यांना नियुक्तीपत्रेही लगेचच दिली. त्यानंतर तरूणांकडून प्रत्येकी पाच हजार रूपये गोळा करण्यास सुरवात केली. काही तरूणांनी पैसे न दिल्याने त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी ते रांजणगाव येथे आले आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले.






