दर्शनाच्या चारित्र्यहननाने व्यथित पत्रकार, किर्तनकाराने उलगडले तिचे विचारविश्व

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्यानंतर खून झालेल्या दर्शना पवारबाबत काही जण आक्षेपार्ह कमेंट व पोस्ट करत आहेत. तर काही जण तिला व मुलींनाच दोष देत आहेत. तिला मार्गदर्शन करणारे कोपरगाव येथील पत्रकार व कीर्तनकार सचिन पवार यांनी फेसबुकवर याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दर्शनाच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्यांबद्दल चीड व्यक्त करत सचिन पवार यांनी लिहिलं आहे की, ‘दर्शनाच्या हत्याकांडाने पुरता हादरून गेलो आहे. त्यासोबतच दर्शनाविषयी समाजमाध्यमांवर अनेक लोक जसे व्यक्त होत आहेत हे तिच्यावर अन्याय करणारे आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो ती संवेदनशील होती, हुशार आणि समजदारही होती. घरची जाण होती. आई-वडिलांची चिंता होती. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते तिला. ती भक्कम व कणखर होती. अधिकारी होण्याअगोदचा तिचा मला पाठवलेल्या मेलचा स्क्रीनशॉट सोबत जोडतो आहे. त्यावरून ती कसा विचार करत होती ते पाहा,’ असं आवाहन पवार यांनी केलं आहे.



सचिन पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे लिहितात की, ‘स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झाल्यावर दर्शनाला माझ्याकडून देखणा विठोबा हक्काने हवा होता. रोज ज्ञानेश्वरी वाचायची. त्या दिवशी ती मित्रासोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेली व तिथं घात झाला. तिचं ट्रेकिंगला जाणं चुकीचं नाही. मित्रासोबत जाणं हे ही चुकीचं नाही. त्यानं तिला लग्नाची मागणी घालणं, हेही चुकीचं नाही. इथंपर्यंत कोणताही गुन्हा नाही. राहुलचं प्रेम एकतर्फी होतं. दर्शनाने नकार दिल्यावर राहुलमधील नराधम जागा झाला आणि त्यानं तिचा जीव घेतला. हा राहुलचा गुन्हा आहे. यात दर्शनाचा काय गुन्हा? आपण सर्वांनी तिला अप्रत्यक्ष गुन्हेगार ठरवणं, संस्काराच्या नावाखाली चारित्र्यहनन करणं बंद केलं पाहिजे. पुरूषी मानसिकतेतील गलिच्छ पोस्टी वाचल्यावर तिटकारा आला. बाईकडे आपण अधिक विवेकाने, समतेनं पहाण्याचं शिक्षण घ्यायची गरज आहे,’ अशा शब्दांत सचिन पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



सचिन पवार यांची मार्गदर्शनासाठी भेट घेतल्यानंतर त्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये दर्शनाने आपला जीवनविषयक दृष्टीकोन आणि त्यामध्ये झालेल्या बदलाविषयी भाष्य केलं होतं. याच ईमेलचा स्क्रीनशॉट सचिन पवार यांनी शेअर केला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, ‘मी आधी फक्त माझ्या करिअरवर फोकस केला होता. पण तुमच्या भेटीनंतर मी आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन शिकले. आयुष्य खूप सुंदर आणि साधेपणाने जगता येऊ शकतं, असं मला वाटतं. तुम्ही दिलेलं एक उदाहरण खूप महत्त्वाचं होतं ते म्हणजे आपली लूट हे कोणी वरिष्ठ स्तरावरील लोक करत नाहीत, तर शेतकऱ्याचा मुलगा म्हणून घेणारे पीएसआय स्तरावरील अधिकारीच करतात. हे सत्य असलं तरी ते बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक समस्यांपासून मी आधी पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. पण या समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे, हे तुमच्यामुळे माझ्या लक्षात आलं,’ असं दर्शनाने सचिन पवार यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.



