मुंबई केंद्रशासित प्रदेश तर मराठवाडा स्वतंत्र करून दाखवू : गुणरत्न सदावर्ते

उस्मानाबाद : मुंबई केंद्रशासित प्रदेश तर मराठवाडा स्वतंत्र करून दाखवू, असं वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही त्यांनी टीका केली. पवार, चव्हाण आणि देशमुख अशी तीन कुटुंबं मराठवाड्याचे मारेकरी असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबई वेगळी का हवी? गुणरत्न सदावर्ते म्हणाले…
मुंबई वेगळी का हवी? या प्रश्नावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “ज्याप्रमाणे पंजाबची राजधानी चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचप्रमाणे मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश केलं पाहिजे. मुंबई २४x७ सुरू ठेवायची असेल, तिचं स्वतंत्र्य आबाधित ठेवायचं असेल, जगाची आर्थिक राजधानी ठेवायची असेल तर मुंबई केंद्रशासित प्रदेश झाली पाहिजे.”



…यांचाही पाठिंबा
“मुंबई स्वतंत्र राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश करण्याच्या माझ्या मागणीला फेसबुकवर ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी आणे यांनीही पाठिंबा दिला आहे,” असंही सदावर्तेंनी नमूद केलं.



सदावर्ते म्हणाले, “शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी शिप्टा नावाची एकमेव कंपनी या भागात आणली. त्या भागातील कष्टकरी त्यांना मतदान देण्यासाठी उत्सुक नव्हते. त्यावेळी वेगळ्या पक्षाची कामगार चळवळ होती. म्हणून ती शिप्टा कंपनीही बंद पाडण्यात आली. एवढे लालची आणि स्वार्थी राजकारणी मी पाहिले नाही.”
“पाणी आणि सिंचनाबाबतही शंकररावांच्या काळात तेच झालं. अशोक चव्हाणांच्या काळात तर ते आदर्शच्या बाहेर जाऊ शकले नाहीत. विलासराव देशमुखांच्या काळात ते साणंदाच्या बाहेर जाऊ शकले नाही. याचं कारण राज्य मोठं होतं हे होतं. वेगवेगळ्या ठिकाणच्या आमदारांची गणती केली जायची. विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यातील जिल्हे यांची बेरीज करून गलिच्छ राजकारण केलं जात होतं,” असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला.
सामान्य लोकांना आवाज नव्हता. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते शरद पवार व कुटुंब, शंकरराव चव्हाण व कुटुंब आणि विलासराव देशमुख व कुटुंब हेच मराठवाड्याचे मारेकरी आहेत. म्हणून आम्ही खनिजाच्या सर्वंकष अभ्यासानंतर मराठवाडा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे ही मागणी घेऊन पुढे आलो आहोत,” असंही सदावर्तेंनी नमूद केलं.
ते पुढे म्हणाले, “छोटी राज्ये मानवी विकासाचं केंद्र होऊ शकतात. तिथं जलदगतीने विकास होऊ शकतो. एका ठिकाणी न्युरोसर्जन उपचार करतोय आणि गडचिरोलीला एखादा व्यक्ती पडला तर न्युरोसर्जन नसल्याने त्याचा मृत्यू होतोय. इथल्या पोलीस अधीक्षकांनी ऐकलं नाही, तर पोलीस महासंचालक मुंबईला असतात. तिकडे कोण जाणार? पोलीस महासंचालक इथल्या इथं मराठवाड्यात असतील तर त्यांच्यापर्यंत पोहचणं सोपं जाईल.”