सामान्यांसाठी महागाईचा मुद्दा जास्त महत्त्वाचा : सुप्रिया सुळे

ठाणे : सामान्य माणसासाठी भोंगे, हनुमान चालिसा यापेक्षा महागाईचा मुद्दा जास्त महत्त्वाचा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. खासदार असल्याने मतदारसंघात मला खूप कामे आहेत, त्यामुळे ती कामे माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे मला इतर गोष्टींकडे बघण्यासाठी वेळ नसल्याचे त्यांनी नमूद केले.
ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेश नाईक यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत मात्र कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आरोप-प्रत्यारोप करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा मुलांवर देखील परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील सर्व राज्ये महागाई कमी करण्यासाठी व्यस्त आहेत. केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. आज प्रत्येक पक्ष सध्या महागाईच्या विरोधात लढत आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा मार्ग केंद्र सरकार काढू शकलेले नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.







