चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव दोषी, पुन्हा तुरुंगात रवानगी होण्याची शक्यता

नवी दिल्ली : चारा घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय कोर्टानं 26 वर्षांनंतर निकाल देत दोषी मानलं आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव जामीनावर बाहेर होते.

डोरांड कोषागारातून 139 कोटी रुपये अवैधरीत्या काढल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांच्यावर लावण्यात आला होता. 1996 साली घडलेल्या या प्रकरणात लालू प्रसाद यादव मुख्य आरोपी होते. आता त्यांना दोषी ठरवल्याचा निर्णय रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने दिला आहे. हा घोटाळा झाला, तेव्हा लालू प्रसाद यादवच बिहारचे मुख्यमंत्री होते. चारा घोटाळ्यात त्यांना 1997 मध्ये अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता.
त्यानंतर 2013 मध्ये सीबीआय कोर्टानं चायबासा कोषागारातून बेकायदेशीररीत्या 37.67 कोटी रुपये काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दोषी मानलं. त्यांना पाच वर्षांची कैद सुनावण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्याच वर्षी डिसेंबरमध्ये जामीन मंजूर केला. त्यानंतर पुन्हा 2017 मध्ये लालू यादव यांना देवघर कोषागारातून 89.27 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात दोषी सिद्ध करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयानं त्यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. बेकायदेशीररीत्या पैसे काढण्याची एकूण पाच प्रकरणं चारा घोटाळा म्हणून जाहीर झाली होती. यापैकी चार प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव दोषी सिद्ध झाले आहेत. देवगड, चायबासा, रांचीतील डोरांड आणि डमका कोषागारातून पैसे काढल्याच्या प्रकरणात लालू यादव दोषी आढळले आहेत. बिहारच्या पशूसंवर्धन विभागात एकूण 950 कोटींचा चारा घोटाळा झाल्याचं 1996 मध्ये उघड झालं होतं.



