संजय राऊतांनी डागली ईडी, फडणवीस, किरीट सौमय्यांवर तोफ; म्हणाले, भाजप नेत्यांचे हजारो कोटींचे घोटाळे

मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील भाजप नेत्यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले असल्याचा आरोप केला आहे. ते साडेतीन नेते कोण? ते उद्यापासून टप्प्या-टप्प्याने कळेल, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांचा विशेषतः ईडीच्या गैरवापराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे सरकार असताना महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप नेते मध्यस्थांमार्फत बिल्डरांकडून वसुली करत असल्याचे त्यांनी सांगितले. किरीट सौमय्या यांच्यावरही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले.

राज्यात भाजपचे सरकार असताना सरकारने महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. हा गंभीर आरोप करताना राऊत यांनी अमोल काळे आणि विजय ढवंगाळे यांची नावे घेतली आहेत. यांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले याची तक्रार आपण करणार असल्याची घोषणा खासदार राऊत यांनी केली आहे.
कितीही धमकावा महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणार. हा फक्त ट्रेलर आहे. येणाऱ्या काळात आणखी कागदपत्रं, आणखी व्हिडिओ समोर येणार.उद्यापासून महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळेल. जसजसे आत घुसू तसतसे भाजपला कळत जाईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ED वाले ऐका , या माझ्या घरी, मी लढणार, जितेंद्र नवलानी कोण आहे ? हे नाव ऐकल्यावर मुंबई आणि दिल्लीतील ED च्या लोकांचा घसा सुकेल. गेले 4 महिने ED च्या नावावर वसुली सुरू आहे, 70 बिल्डरकडून सुरू आहे, हे ED च्या काही अधिकाऱ्यांना माहीत आहे. मी याबाबत मोदी, अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे. अशा 4 एजंटनी 300 कोटी रुपये वसूल केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागीदार आहेत. किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली, असा आरोपही राऊतांनी केला.
ठाकरे परिवाराच्या नावावर 19 बंगले आहेत, असा दावा त्या दलालाने केला आहे, मुलुंडच्या दलालाने. माझं त्याला आव्हान आहे, आपण सगळे मिळून बस करून त्या 19 बंगल्यांवर पिकनिकला जाऊ. मी देतो चाव्या. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन, असे राऊतांनी सांगितले.
ज्या ज्या वेळी मी म्हणालो की महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, त्या त्या वेळी माझ्या नातेवाईकांवर, कुटुंबियांवर धाडी पडल्या. माझ्या मुलांना फोन करून धमक्या दिल्या की तुमच्या वडिलांना उद्या पोलीस घेऊन जातील. इतकं घाणेरडं राजकारण भाजपकडून सुरू आहे, असा आरोप राऊतांनी केला.



