मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही; पवारांचा इशारा

लोणावळा : मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी सुनील शेळकेंवर निशाणा साधला आहे. लोणावळ्याच्या सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी पवारांनी म्हटलं की, मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, अशा शब्दात पवारांनी सुनील शेळकेंवर घणाघात केला आहे.
शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलं आहे की, लोकशाहीला संकटात नेहणारा कारभार मोदींकडून सुरू आहे. सामान्य माणसांचे अधिकार उध्वस्त होतील. त्यामुळं लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवं. सत्तेचा गैरवापर भाजप करतं आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडतंय. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ही लवकरच अटक केली जाईल, असंही पवारांनी म्हटलं आहे.

पवार पुढे म्हणाले की, मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे, असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष म्हणाले, असं म्हणत त्यांनी चव्हाणावर टीका केली आहे.
मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला’ असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो हिंमत असेल तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, पण मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळं भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.









