कार-बसचा भीषण अपघात; महिलेसह चौघांचा मृत्यू

मुंबई : कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेसह चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असेलल्या महालक्ष्मी मंदिराजवळ पहाटे तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने लक्झरी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एका महिलेचादेखील समावेश होता. तसेच लक्झरी बसचालकासह अन्य तीन प्रवाशी जखमी झाले.
स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. याच परिसरात 8 जानेवारी रोजी झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता.




