पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सामूहिक राजीनाम्याच्या पवित्र्यात; दीपक मानकरांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार निवडीत डावलले गेल्याने कार्यकर्त्यांचा संताप

पुणे : पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी सामूहिक राजीनाम्याच्या पवित्र्यात आहेत. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेवर शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी देण्यात आली नाही. यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले असून सामूहिक राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आले आहेत.
आज राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 7 जागांवर भाजप कडून 3 , शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून 2 जागेवर आमदारांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस कडून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्यातील शहाराध्यक्ष दीपक मानकर यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेसाठी जोरदार चर्चेत होते. पुण्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दीपक मानकर यांनी आमदार करावे यासाठी जोर लावला होता व तशी मागणीही पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे पुण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना दीपक मानकर आमदार होतील. अशी मोठी अपेक्षा होती. मात्र पक्षाकडून मानकर यांना संधी देण्यात आली नाही. त्यामूळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला.
सोमवारी सायंकाळी नारायण पेठेतील पक्ष कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जमायला सुरूवात केली. यावेळी चाळीस वर्षे राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करूनही मानकर यांना पक्षाकडून संधी मिळत नसेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामूहिक राजीनामा देणार असल्याच्या भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.



दीपक मानकर यांनी शहराधक्ष पद स्वीकारल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद शहरात वाढवली. पहिल्याच जाहीर केलेल्या कार्यकारिणीत त्यांनी पक्षातील वरिष्ठांना आपली ताकद दाखवून दिली. तेव्हापासून आजपर्यंत पक्षात अनेक जण येत असून पक्षामध्ये पदांचे वाटप सुरूच आहे. पक्षाची मोठी ताकद शहरात ऊभी करणाऱ्या दीपक मानकर यांची वर्णी राज्यपाल नियुक्त आमदार पदावर होईल अशी अपेक्षा सर्वच कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र ती पूर्ण होऊ न शकल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. त्यांची नाराजी पक्ष कशी दूर होणार हे पाहावे लागेल.









