फडणवीस यांना नोटीस पाठवायची पहिली वेळ नाही : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक नव्हे तर सहा वेळा नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही. नोटीस म्हणजे समन्स नाही. फडणवीसांकडे काही माहिती आहे. ती माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस गेले आहेत. तसेच एसआयटीच्या कार्यालयातून काही गोपनीय पत्रं आणि तांत्रिक माहिती बाहेर गेली आहे. त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी त्यांचा जबाब नोंदवला जात आहे, असं दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
या प्रकरणात एकूण 24 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. फडणवीसांची साक्ष बाकी होती. त्यांना काही प्रश्नावली पाठवली होती. त्यांच्याकडून प्रश्नावलीची उत्तरे आली नाही. म्हणून पोलिसांनी त्यांच्या घरी त्यांचा जबाब घेण्याचा निर्णय घेतला. त्यात गैर काही नाही, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई सायबर पोलीस ठाण्यात 26 मार्च 2021 रोजी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाची माहिती गहाळ झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पाच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 24 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. गुन्ह्याच्या संदर्भात तपास करण्याच्या दृष्टीकोनातून ज्यांचा याप्रकरणाशी संबंध आहे त्यांचा जबाब घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
एखाद्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करणे हे राजकारणात सुरूच असते. त्याप्रमाणे भाजप करत आहे. यामध्ये दंगा करण्यासारखे काही नाही. देवेंद्र फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस पाठवण्यात आलेली नाही. हे एक वर्ष जुने प्रकरण आहे. एका वर्षापासून त्यांचा जबाब न मिळाल्याने तपास थांबला होता. त्यामुळे जबाब नोंदवण्यात येत आहे. मुंबई पोलीस एसआयडी मधून माहिती बाहेर कशी गेली याचा तपास करत आहेत. त्या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे चौकशी सीबीआय करत आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.




