पोलीस आयुक्तांनी खोडले नवनीत राणांचे आरोप; ट्विट केला चहा पितानाचा व्हिडीओ

मुंबई : प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नवनीत राणा यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. नवनीत राणा यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं असून त्यांनीदेखील याची दखल घेत २४ तासात सविस्तर माहिती देण्यास सांगितलं आहे. यादरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा पोलीस ठाण्यातील एक व्हिडीओ ट्वीट करत आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
राणा दांपत्याचा व्हिडीओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट केला असून यामध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा पोलीस ठाण्यात बसून चहा पित असल्याचं दिसत आहे. नवनीत राणा यांनी एकीकडे पोलिसांनी पाणीदेखील दिलं नसल्याचा आरोप केला असताना संजय पांडे यांनी या व्हिडीओतून त्यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. संजय पांडे यांनी व्हिडीओ ट्वीट करताना आम्हाला अजून काही बोलायची गरज आहे का? अशी विचारणा केली आहे.
“मी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घऱाबाहेर हनुमान चालिसा म्हणायची परवानगी मागितली होती. आणि मी तेवढंच करणार होते. कोणत्याही धार्मिक भावना भडकावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं की, तुम्हीही या. मात्र यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी सांगितलं की मातोश्रीवर जाणार नाही. त्याऐवजी माझ्या खारमधील राहत्या घरीच हनुमान चालिसा म्हणणार आहे,” अशी माहिती नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे.
“मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असंही सांगितलं,” असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
नवनीत राणा यांच्या अटकेप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडून सविस्तर माहिती मागवली आहे. ओम बिर्ला यांनी २४ तासात ही माहिती सोपवण्यास सांगितलं आहे. नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांकडून अमानवीय वागणूक दिली जात असल्याची तक्रार करणारं पत्र लिहिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ही माहिती मागवली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असून त्यामध्ये वस्तुस्थिती नाही तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनी माहिती मागवली आहे तर ती माहिती राज्य सरकार देईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.



